नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एबी फॉर्म वाटतांना नाशिकमध्ये (Nashik) जो काही गोंधळ झाला त्याला मी जबाबदार असे समजून सर्व नेत्यांनी एकत्र होऊन पक्षाच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) शहरातील श्रद्धा लॉन्स येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या गोंधळाबाबत दिलगिरी व्यक्त करत विजयासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना आपले कार्य समजून सांगावे असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी नाशिक महापालिका निवडणुकीचा नारळ फोडून शुभारंभ देखील केला.
हे देखील वाचा : BMC Election Manifesto : ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर; सत्ताधाऱ्यांवर बरसले, नेमकं काय म्हणाले?
यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले की, नाशिकमध्ये झालेल्या गोंधळाचे सर्वत्र अवलोकन केले जात आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल. निवडणूकीचा कालावधी कमी असल्याने सध्या काही निर्णय घेणे योग्य नाही. जे काही घडले आहे त्याचे दडपण सर्वांनाच आहे.पंरतु, त्यावर आज पडदा टाकला तर ते योग्य राहील. त्यामुळे सर्व मीच केले असे समजून पक्षातील जुने आणि नवे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काम करावे, असं सांगत त्यांनी घडलेल्या प्रकारावरती आपली नाराजी व्यक्त करत माफी मागितली. तसेच आपल्याला निवडणूक (Election) जिंकायची असून, नाशिककरांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. नाशिककरांना आज ज्या अडचणी येत आहेत त्या सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध असून, यात कोणतेही शंका नाही. असेही रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात मनसेला धक्का; माजी नगरसेविकेचा भाजपमध्ये प्रवेश
पुढे ते म्हणाले की, नागरिकांनी (Citizen) मतदारांच्या (Voter) घरोघरी जाऊन त्यांना राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि देशात नरेंद्र मोदी यांनी जी विकासकामे केलेली आहेत, जी समाज उपयोगी आहेत त्याबाबतची माहिती देऊन त्यांच्याकडून शहराचा विकास व्हावा, त्यांच्या अडचणी कमी व्हाव्या यासाठी भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे याबाबतची संकल्पना समजून सांगावी. मतदारांचे हे एक मत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे याची आठवण मतदारांना करून द्यावी म्हणजे विकासाचा मार्ग मोकळा होईल हे देखील समजून सांगावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केले.
हे देखील वाचा : Girish Mahajan : “कोण खरे आहे ते…”; उमेदवारीवरून गोंधळ घालणाऱ्यांना मंत्री महाजनांनी दिला इशारा
तसेच हे सर्व करत असताना ज्या भागामध्ये आपले आमदार (MLA) आहेत त्या भागातील आमदारांनी बुथ स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करावी. त्यांना अधिक बळकट करून त्यांना हवी ती सामुग्री उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना चव्हाण यांनी आमदारांना करत ज्या ठिकाणी पक्षाचे आमदार नाही त्या ठिकाणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे आणि बुथ यंत्रणा सक्षम करावी असे सांगितले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी किमान दहा तास तरी काम करून घराघरापर्यंत आपली विचार धारा पोहचवली पाहिजे. आगामी महापौर हा तुमच्या ताकदीने निवडून येईल. तुमच्या प्रभागातील नगरसेवक निवडून येतील आणि शहराचा विकास होईल हे लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जात मतदान कमळाला कसे होईल, याकडे कल असला पाहिजे, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
दरम्यान, या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आमदार देवयानी फरांदे , सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी आमदार अपूर्व हिरे, सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, राहुल कुलकर्णी, नाना शिलेदार, पवन भगूरकर, गोविंद बोरसे यांच्यासह पक्षाचे उमेदवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विजय मेळाव्याचे प्रस्ताविक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील देसाई यांनी केले.
गिरीश महाजन काय म्हणाले?
महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती पक्षाकडे उमेदवारांची मागणी होती. परंतु जागा फक्त ११२ असल्याने निवड करणे अतिशय अवघड होते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी निवड करताना काही निकष लावले आणि त्या निकषाच्या आधारावर तीच उमेदवारी दिली आहे. अनेक जण नाराज झाले पण आमच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. आता सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.




