नाशिक | Nashik
मरळगोई खु. येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून आदिवासी नागरिकांना (Tribal People) मारहाण, शिवीगाळ, विनयभंगप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरळगोई खु. येथील युवकाने लासलगाव पोलीस ठाण्यात (Lasalgaon Police Station) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सध्या आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथे दोन वर्षांपासून पत्नीसोबत राहत असून माझे कुटुंबीय मरळगोई खु. येथे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पत्नी व मित्रांसह मी शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मूळ गावी मरळगोई खु. येथे कुटुंबियांना भेटून आळंदीकडे परत जात होतो. गावातील मारुती मंदिराजवळ आल्यानंतर गावातील प्रसाद अंबादास फापाळे, राकेश संजय फापाळे, अनिल बाबासाहेब फापाळे, सागर सोमनाथ फापाळे, प्रतीक शरद फापाळे हे उभे होते.
प्रतीक फापाळे व सागर फापाळे यांनी माझी गाडी अडवून जुन्या भांडणाची कुरापत काढून, ‘तू गावात कसा काय आला?’ असे म्हणून शिवीगाळ करू लागले. बाजूलाच असलेले प्रसाद फापाळे याने माझी गच्ची धरून जातीवाचक शिवीगाळ करत मला हाताचापटीने मारले. राकेश फापाळे व अनिल फापाळे यांनी माझी गच्ची धरून, शर्ट फाडून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले, तेव्हा मला सागर फापाळे व प्रतीक फापाळे यांनी जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. गाडीतील मित्रांनी सोडयासोडवी करत याबाबत माझ्या वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर आई, वडील,चुलती व आजी त्या ठिकाणी आले. ते वरील व्यक्तींना समजावून सांगत असताना राकेश फापाळे व प्रसाद फापाळे यांनी माझ्या आईशी पण गैरवर्तन करत तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, सदर झटापटीत आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसान झाले. त्यानंतर वरील सर्व व्यक्तींनी माझी चुलती, पत्नी व आजी यांनादेखील जातीवाचक शिवीगाळ करून, ‘तुम्ही आमचे काय वाकडे करणार? तुम्हाला गावातून हाकलून देऊ व तुमचे हातपाय तोडून टाकू’ अशी धमकी दिली, असे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमअन्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. भास्करराव शिंदे करत आहेत.