नाशिक | प्रतिनिधी
शेअर मार्केटमधील आर्थिक गुंतवणुकीसोबतच त्यावर थेट पन्नास टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय सायबर चोरट्यांनी नाशिकमधील व्यावसायिक, उद्योजक व नोकरदार अशा नऊ जणांकडून तब्बल एक कोटी १९ लाख रुपये उकळले आहेत. पैशांचा परतावा मिळत नसल्याने व संशयितांचे संपर्क क्रमांक बंद असल्याने ही फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत गेल्या तीन दिवसांत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले असून, तपास केला जात आहे.
शहरातील एकूण नऊ नोकरदार, उद्योजक, सेवानिवृत्त हे घरी व वेगवेगळ्या कार्यालयांत असतांना जून ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांना संशयित सायबर चोरटे, हॅकर महेश वर्मा, प्रणव अंबानी, मोहन वर्मा, देविका मेनन, अरविंद शर्मा व अन्य चोरट्यांनी विविध मोबाईल नंबर, व्हॉट्स अॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियाद्वारे संपर्क करुन शेअर ट्रेडिंग, जास्तीचे आयपीओ, फॉरेक्स ट्रेडिंगवर (परदेशी चलन खरेदी-विक्री व्यवहार) थेट गुंतवणूकीसोबतच त्यावर ५० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. संशयितांनी या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी ‘अनेक गुंतवणुकदारांना कसा व किती फायदा झाला आहे’, हे सांगणारे व्हिडीओ, पीपीटी, बाईट्स दाखविले. त्यावर विश्वास बसल्याने जादा परताव्याच्या अमिषाने संशयितांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर ऑनलाइन पैसे वर्ग केले. दरम्यान, पैसे ट्रान्स्फर केल्यावर अनेक दिवस उलटूनही परतावा क्रेडीट होत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.
यानंतर प्रथम ज्या नंबरवरुन सायबर चोरट्यांनी संपर्क केले, त्या नंबरवर संपर्क साधला असता, ते नंबर बंद आढळले. त्यानुसार फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केल्या आहेत. त्यानुसार, आता ज्या संशयास्पद बँक खात्यात पैसे वर्ग झाले आहेत व तेथून पुढे कुठे ट्रान्स्फर झाले, याची पडताळणी पोलीस करत आहेत.
- नऊ तक्रारदारांनी गमावले इतके पैसे
- एका गुन्ह्यात पाच तक्रारदारांनी ७१ लाख ४९ हजार रुपये
- दुसऱ्या गुन्ह्यात दोन तक्रारदारांनी २९ लाख ८ हजार रुपये
- तिसऱ्या गुन्ह्यात दोन तक्रारदारांचे १४ लाख ४२ हजार रुपये
- एकूण एक कोटी १९ लाख रुपये