नाशिक | प्रतिनिधी
येथील श्रमिकनगर परिसरात टवाळखोरांनी दहशत माजवत, वाहनांची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (दि. ६) पहाटे घडली. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कडेपठार चौक, श्रमिकनगर येथे सोमनाथ नागरे यांची आयशर (एमएच १५जीव्ही ८५८५) व अरुण कोळी यांची महिंद्रा पिकअप (एमएच५४-००५३) नेहमीप्रमाणे घरासमोरील पार्किंगमध्ये उभ्या केल्या होत्या. बुधवारी मध्यरात्री काही अज्ञात टवाळखोरांनी या वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी देखीलं याच परिसरात काही टवाळखोरांनी एक आयशर ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी सांगितले.
घटना सकाळी, पोलीस दुपारी
वाहनांच्या काचा फोडल्याची घटना सकाळी सात वाजता लक्षात आल्यावर नागरिकांनी लागलीच सातपूर पोलीस ठाण्याला कळवले. मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नित्याच्या घटना
गाड्यांची तोडफोड, जाळपोळ, पेट्रोल चोरणे, वाहनचोरीच्या घटना सातपूर परिसरात नित्याच्या बनल्या आहेत. अशा घटनांमुळे वाहने कुठे लावावीत ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांची दहशत हवी
अनेक वेळा तक्रार करूनही गुंडांवर कारवाई केली जात नाही. मोकळे मैदान, मंदिर या ठिकाणी गस्त घातली जात नाहीत. परिसरातील गुंड, टवाळखोर यांच्यावर सातपूर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी जगावे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात पोलिसांचा वचक हवा. मात्र येथे परिस्थिती उलट असून गुंडाची दहशत वाढत असल्याचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी म्हंटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा