नाशिक | Nashik
‘आदीकर्मयोगी अभियान’ (Adikarmayogi Campaign) अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्याला (Nashik District) शुक्रवार (दि.१७) ऑक्टोबर रोजी गौरविण्यात आले. हा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आला.
आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड (Leena Bansod) तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय यश संपादन केले असून, या सामूहिक प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्याचा सन्मान स्वीकारला. यावेळी प्रकल्प अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, प्रकल्प अधिकारी (कळवण) ए. के. नरेश, सहायक प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन नाईक आणि जिल्हा व्यवस्थापक (पेसा) राकेश वाघ उपस्थित होते.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रापंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केलेल्या विशेष कामगिरीबरोबरच सर्व तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) तसेच ASSK, RGSA आणि PESA टीम यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, यासोबतच जिल्ह्यातील (District) सर्व सरपंच, ग्रापंचायत प्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली तसेच सरपंच व ग्रामपंचायत (Sarpanch and Gram Panchayat) प्रतिनिधींचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
हा सन्मान नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामपंचायत यांनी एकसंघपणे कार्य केल्यानेच हा राष्ट्रीय दर्जाचा सन्मान मिळवता आला. आदीकर्मयोगी अभियानाच्या माध्यमातून पेसा क्षेत्रातील ग्रामविकासात नावीन्य, पारदर्शकता जनसहभाग यांचा नवा आदर्श नाशिक जिल्ह्याने घालून दिला आहे.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक




