नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) मागील सुमारे तीन आठवड्यांपासून सुरू असलेला जोरदार प्रचार मंगळवारी (दि.१३) सायंकाळी पाच वाजता थांबला. प्रचाराची सांगता होताच शहरातील विविध राजकीय पक्षांसह उमेदवारांच्या प्रचार कार्यालय येथील फलक झाकण्यात आले. ज्या ठिकाणी मंडा उभारण्यात आले होते ते मंडपदेखील कढण्यात आले. तसेच विविध प्रकारे वाहनांद्वारे जे प्रचार चालू होते ती वाहने देखील थांबली. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी तसेच विविध उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
हे देखील वाचा : Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या उमेदवारावर ताणली बंदूक!
त्यानंतर उद्या (दि.१५) रोजी मतदान (Voting) होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मतदान केंद्रांवर आज (बुधवारी) कंट्रोल युनिटस्, बॅलेट युनिटस् यांच्यासह निवडणूक कर्मचारी पोलीस बंदोबस्तात नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. शहरातील २६६ संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त व देखरेख ठेवण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी ४८६० बॅलेट युनिटस् व १८०० कंट्रोल युनिटस् (राखीव युनिटसह) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय निवडणूक कामकाजासाठी ८,८०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : मतदानाआधी ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात; मतांचा फुटला मोठा भाव
या निवडणुकीसाठी (Election) एकूण ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.
हे देखील वाचा : Nashik News : चौक सभेदरम्यान मंत्री महाजनांशी बाचाबाची
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवार, पक्ष किंवा कार्यकर्त्यांविरूद्ध लोकप्रतिनिधी कायदा व निवडणूक नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासक तसेच उपायुक्त (निवडणूक विभाग) यांनी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांना आयोगाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी निर्भयपणे, शांततेत आणि मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.




