नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे तर नुकसान होतच आहे. मात्र, पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ६२२३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक, मालेगाव, सटाणा, कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यातील १०१७ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून १९,९०७ शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.
अवकाळीचा सर्वाधिक फटका मका, सोयाबिन, भात, टोमॅटो व भाजीपाला यांना बसला आहे. तसेच आंबा, पेरू, डाळिंब अशा १४ हेक्टरवरील फळबागांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाला असून शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
२८५८ हेक्टरवरील कांदा पिकाला फटका
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, २८५८ हेक्टरवरील कांद्याचे पीक पावसाने खराब झाले आहे. तर १०० हेक्टरवरील कांदा रोपवाटिकांचेही अवकाळीने नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यातील १२९१ हेक्टर, मालेगाव तालुक्यातील १६४ हेक्टर, नाशिक तालुक्यातील १४३ हेक्टर, दिंडोरी तालुक्यात ४३८ हेक्टर, सुरगाणा तालुक्यात १०७ हेक्टर, कळवण तालुक्यात २८३ हेक्टर, निफाड तालुक्यातील १८० हेक्टर, सिन्नर तालुक्यातील १.९५ हेक्टर, चांदवड तालुक्यातील ११७ हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान (Damage) झाले आहे.