नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकला (Nashik) हरित करण्याचे स्वप्न दाखवले खरे, पण त्यांच्याच नाकाखाली प्रशासनाने या संकल्पाला हरताळ फासण्याचे काम सुरू केले आहे. मखमलाबाद शिवारात मोठ्या थाटामाटात, संत-महंतांच्या उपस्थितीत लावलेली झाडे आता मृत्यूच्या दारात असून, प्रशासनाच्या या कारभाराविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी मखमलाबाद शिवारात (Makhmalabad Area) ७५० झाडे लावताना मोठी भाषणे झाली. दाट वनराई उभी करू, खड्ड्यांची खोली मोजली आहे, जातींचा अभ्यास केला आहे असे दावे करण्यात आले. पण आठवडा उलटत नाही तोच ही झाडे सुकू लागली आहेत. झाडे लावून फोटो काढले की काम संपले, अशा मानसिकतेत प्रशासन वावरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
वेळ निघून जाण्यापूर्वी जाग येणार का?
जर येत्या दोन-तीन दिवसांत या झाडांना (Trees) पाणी आणि खत देऊन वाचवले नाही, तर मखमलाबादची ही वनराई केवळ कागदावरच शिल्लक राहील. मंत्र्यांच्या शब्दाला किंमत द्यायची नसेल, तर किमान पर्यावरणाची तरी लाज राखा, अशी भावना पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
पर्यावरणाच्या नावाखाली केवळ इव्हेंटबाजी सुरू आहे. मंत्र्यांच्या संकल्पाला अधिकारीच सुरुंग लावत असतील, तर अशा कामचुकार प्रशासकांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
संतप्त नागरिक, मखमलाबाद शिवार
प्रशासनाचा हलगर्जीपणा की जनतेच्या पैशांचा अपव्यय?
- पाण्याचा पत्ता नाहीः झाडे लावली पण त्यांना पाणी घालण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही.
- देखभालीचा अभावः संगोपनाच्या गप्पा मारणारे अधिकारी आता फिरकायलाही तयार नाहीत.
- संकल्पाची थट्टाः कुंभमेळा मंत्र्यांनी १५ हजार झाडांचा निर्धार केला असताना, सुरुवातीच्या साडेसातशे झाडांचीच ही अवस्था असेल, तर बाकी झाडांचे काय होणार? असा जळजळीत प्रश्न उपस्थित केला जात आहे.




