नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केंद्र सरकारच्या (Central Government) किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत (Nafed) होणाऱ्या कांदा खरेदीत गंभीर अनियमितता समोर आली आहे. पिंपळगाव बसवंत येथील बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था अवसायनात गेल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी या कारवाईला तूर्तास स्थगिती देत कागदपत्रांची पडताळणी करून पुढील सुनावणीअंती निर्णय घेण्याचे स्पष्ट केले आहे.
नाफेडने राज्यातील २५ सहकारी संस्थांमार्फत १.५० लाख टन कांदा खरेदी केली. यात पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील उक्त संस्थेचा समावेश होता. मात्र, जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या तपासणीत संस्थेची निवडणूक प्रक्रिया न झाल्याचे, ताळेबंद सादर न केल्याने संचालक मंडळ परस्पर बदलल्याचे उघड झाले. यामुळे सहकार कायद्याअंतर्गत संस्था अवसायनात निघाल्याचे जाहीर करत नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान, यापूर्वी नाफेडच्या कांदा खरेदीत शेतकरी (Farmer) उत्पादक कंपन्यांच्या महासंघाद्वारे काही व्यापारी आणि भांडवलदारांनी मोठी लूट केल्याचे प्रकरण समोर आले होते. यंदा काही व्यापाऱ्यांना काम मिळाले नसल्याने त्यांच्याच तक्रारींमुळे हे प्रकरण उघड झाल्याचा संशय आहे. यामुळे गोंधळ झाकण्यासाठी संबंधित संस्था पुढे सरसावल्याची चर्चा आहे. उपनिबंधकांच्या कारवाईनंतर नाफेडने खरेदी केलेला कांदा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सध्या हा कांदा संबंधित संस्थेकडेच आहे.
पुढील सुनावणीकडे लक्ष
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पुढील सुनावणीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे कांदा खरेदी प्रकरणातील अनियमिततेवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. विभागीय सहनिबंधकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पारदर्शक कारवाईची मागणी होत आहे.




