नाशिक | Nashik
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्षेचा मानले पाहिजे, असे विधान माध्यमांशी बोलतांना केले होते. यावरून भाजप (BJP) चांगलाच आक्रमक झाला असून, सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेस कमिटी समोर भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलतांना आमदार फरांदे म्हणाल्या की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला आणि महाराष्ट्राला एक मोठा इतिहास दिला आहे. याच महाराष्ट्रात त्यांनी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. पण टिपू सुलतान (Tipu Sultan) अतिशय क्रूर प्रशासक राजा होता. त्यांनी लाखो हिंदूची हत्या केली, लाखो हिंदूचे बळजबरीने धर्मांतर केले, असे त्यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणल्या, अशा क्रूर टिपू सुलतानची तुलना शिवजयंती जवळ आलेली असताना छत्रपती शिवाजी महाराजांशी करावी असे क्रूर कृत्य महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. त्यामुळे आम्ही शहरातील काँग्रेस कमिटीसमोर सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आलो आहोत. त्यांचा त्वरित राजीनामा काँग्रेसने घेतला पाहिजे नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणारं नाही, असेही आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी म्हटले.





