नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) १५ तालुक्यांतील ६ हजार, ५७० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने (Department of Agriculture) जिल्हा प्रशासनाला दिला आहे. फक्त मे महिन्यात सुमारे १ हजार गाचे बाधित झाली असून, सुमारे १९ हजार ९०७ शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पारा चाळीशीपार पोहोचल्याने उकाडा असह्य होत होता. मात्र ७ मे पासून अवकाळीने जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांना झोडपून काढले.
अवकाळीने बहुतांश शेतीपिके आणि फळपिकांना नष्ट केले. काढणीला आलेला कांदा अन् साठवणूक केलेल्या कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील (District) सुमारे ६ हजार ५७० हेक्टर क्षेत्राला अवकाळीने बाधित केले. वादळीवारे, अतिवृष्टी, अवेळी पावसाने शेतीपिकांचे आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून नुकसानग्रस्त शेतीषिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी त्वरित दिले होते. त्यानूसार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंधरा तालुक्यांतील नष्ट झालेल्या शेतीपिकांचा प्राथमिक अहवाल तयार करून कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना सादर केला आहे.
कृषी अधीक्षकांनी तो जिल्हा प्रशासनाला सादर केला. नष्ट झालेल्या पिकांमध्ये (Crops) १४ हेक्टरवर लावलेला मका पूर्णतः नष्ट झाला तर ८८ हेक्टरवरील कांद्याच्या रोपवाटिका आणि २ हजार, ८०० हेक्टरवरील कांदा पिकावर संक्रांत कोसळली. ६४ हेक्टरवरील गहू पिके, १३० हेक्टरवरील टॉमेटो तर साडेसातशे हेक्टरवरील भाजीपाला नष्ट झाला. अवकाळीने ३ हजार ८८७हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान (Damage) झाले आहे.
दोन हजार हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान
नाशिक जिल्ह्याचे हवामान हे आंबा पिकाला अनुकूल असल्याने मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक घेतले जाते. मात्र यंदा अवकाळीने आंबा पिकालाही नष्ट केले सुमारे २ हजार हेक्टरवरील आंबपिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, अवकाळीमुळे २ हजार ३२० हेक्टरवरील फळपिके नष्ट झाली आहेत.
तीन हजार हेक्टरवरील बागायती पिके नष्ट
जिल्ह्यात बागायती पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. नाशिक जिल्ह्याचे वातावरण फळपीकांना पोषक असल्याने फळपीकांची शेतीही येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र में महिन्यात अवकाळीने शेतकऱ्याला आसमान दाखविले. जिल्ह्यातील १ हजार गावांतील सुमारे २० हजार शेतकऱ्यांची बागायती पिके नष्ट झाली एप्रिलमध्ये बागायतीचे १८७० हेक्टर तर मे महिन्यात ३ हजार ८८७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
७५० हेक्टरवरील भाजीपाला नष्ट
जिल्ह्यात बळीराजाकडून भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. मुख्य बागायती पिकासोबत भाजीपाल्याची लागवड केली जाते, मात्र अवकाळीने बागायती पिकांसोबत ७५० हेक्टरवरील भाजीपाला नष्ट केल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे भाजीपाला महागण्याची चिन्हे आहेत.
शासनाकडून नुकसानीचे दर निश्चित
कोरडवाहू क्षेत्रासाठी १३ हजार ६००, बागायत क्षेत्रासाठी २७ हजार, फळपीके क्षेत्रासाठी ३६ हजार प्रती हेक्टर दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानूसार एकूण ६ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
२ हजार हेक्टरवरील कांदा नष्ट
नाशिक जिल्हा कांदा लागवडीसाठी ओळखला जातो. दरवर्षी सुमारे ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा पीक लावले जाते. मात्र अवकाळीने यंदा २ हजार ८८७ हेक्टरवरील कांदा पिके नष्ट झाली. यामुळे पुन्हा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.