नाशिक | प्रतिनिधी | Nashik
डोक्यावर तुळशीवृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद अशा उत्साहपुर्ण वातावरणात विविध शहरातून निघालेल्या दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) दिशेने मार्गक्रमण करत आहेत. वारकर्यांच्या अखंड नामस्मरणामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले असून, परिसर दुमदुमून गेला आहे.
येत्या बुधवारी (दि.१४) रोजी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा (Sant Nivruttinath Maharaj Yatra) उत्सव (पौष वारी)मंगळवारी (दि.१४) साजरा होत आहे. त्याअनुषंगाने एक दोन दिवस अगोदरच राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, असा गजर करत वारकर्यांच्या दिंड्या नाशिक शहरातून त्र्यंबककडे जात आहेत. सातपूर, पिंपळगाव बहुला याठिकाणी दिंड्यांचे विविध सामाजिक राजकीय संस्थांसह घरोघरी स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, यंदा यात्रा काळात पाच लाख भाविक (Devotee) येण्याचा अंदाज असून सुमारे ६०० दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सेवेकर्यांच्या माध्यमातून या वारकर्यांच्या सेवेसाठी विविध खाद्यपदार्थ व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तर त्र्यंबकेश्वर रस्ता पिंपळगाव बहुला येथून पूढे खोदून ठेवल्याने त्या मार्गावरुन मार्गक्रमण करताना वारकर्यांची खर्या अर्थाने परीक्षाच घेतली जात आहे.
दिंड्यांचा अनेक ठिकाणी मुक्काम
नाशिक शहरातून दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करत असताना सातपूर, पिंपळगाव बहुला, महिरावणी, तळेगाव (अं) खंबाळे, वाढोली, अंजनेरी या भागातील अनेक ठिकाणी दिंड्या मुक्कामी आहेत. प्रत्येक घरोघरी दिंड्यांचे स्वागत होत आहे. ठिकठिकाणी वारकर्यांच्या सेवेसाठी विविध स्टॉल्स उभारण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातून वारकर्यांची ठिकठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील करण्यात येत आहे.
प्रशासनाचे नियोजन चुकले
त्र्यंबकेश्वरच्या यात्रेपूर्वीच रस्ता खोदल्याने प्रशासनाला तो तातडीने माती टाकून सलग करणे भाग पडले आहे. त्यात खड्डे असल्याने नागरीकांचे हाल होत असले तरी या मार्गावरून वाहतूक होत नसल्याने काही अंशाने मोकळेपणाने या मार्गावरुन जाणे सोयीचे ठरत असल्याचे समाधान वारकरी व्यक्त करीत आहेत.




