पालखेड मिरचीचे | वार्ताहर | Palkhed Mirchiche
गेल्या सहा महिन्यांपासून पडणाऱ्या अवळी पावसान शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकाची पूर्णतः वाताहत झाल्याने दैनंदिन जीवनमान जगायचे कसे व वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत सापडलेल्या पाचोरे वणी (Pachore Vani) येथील रंगनाथ नामदेव वाटपाडे (७५) या शेतकऱ्याने द्राक्षबागेचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. कर्ज फेडण्याच्या विवंचनेत सलग दुसऱ्या शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे निफाड तालुका हादरला आहे.
रंगनाथ वाटपाडे यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या टोमॅटो पिकाला (Tomato Crop) समाधानकारक भाव मिळाला नाही. लाल कांदे देखील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने पूर्णतः खराब झाले. उन्हाळ कांद्याचे रोपदेखील या पावसातून वाचले नाही. द्राक्षबागेची छाटणी करून काही दिवस झाले असताना द्राक्ष झाडांवर द्राक्षमालच दिसत नसल्याने रंगनाथ वाटपाडे हतबल झाले होते. वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत गेल्या दोन दिवसांपासून वाटपाडे हे आपल्या घरात वावरत होते.
वाढलेल्या कर्जाबाबत (Loan) घरातील सदस्यांसोबत संवाद साधला असता शेतातून दोन पैशाचेही उत्पन्न घरात येणार नसल्याने घरातील सदस्यदेखील चिंतेत असल्याचे वाटपाडे यांच्या लक्षात आल्याने मी माझ्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही. त्यातच राज्य शासनाच्या कर्जमाफीबद्दल असलेल्या उदासीन धोरणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी वाटपाडे यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयाचे मत आहे. वाटपाडे यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याला (Police Station) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राज्य शासन अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट बघत आहे. ‘शेतकऱ्याचे मरण हेच शासनाचे धोरण’ अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.
प्रकाश वाटपाडे, उपतालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष





