नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेचा (NMC) तब्बल २३७कोटी रुपयांचा शहर सफाईचा ठेका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, या ठेक्यावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी (Hearing) पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. निकाल आल्यावर मनपा पुढील कारवाई करणार आहे. मनपाने निविदा प्रसिध्द केल्यावर एकूण १३ ठेकेदारांनी त्यात भाग घेतला होता.
प्राथमिक फेरीत त्यातील नऊ ठेकेदार बाद झाले, तर ग्लोबल कोणार्क, सध्या काम करणारी वॉटर ग्रेस, तसेच लायन हे ठेकेदार पात्र ठरले होते. यानंतरच्या टप्प्यात तांत्रिक तपासणीसाठी मनपाने (NMC) ७० गुण कागदपत्रांसाठी आणि ३० गुण सादरीकरणासाठी ठेवले आहेत. मात्र, या चारही ठेकेदारांची तांत्रिक तपासणी अद्याप बाकी आहे. या ठेक्याची चर्चा अनेक कारणांनी सुरु आहे.
सुरुवातीला हा ठेका १७८ कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होता. मात्र, होऊ घातलेल्या सिंहस्थाच्या (Simhastha) तयारीच्या कारणाने तो थेट २३७ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून या ठेक्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेतील काही अटी व शर्तीबाबत वॉटर ग्रेस कंपनीने आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. या ठेक्याची मुदत ऑगस्ट २०२३ मध्येच संपली होती. मात्र, विविध कारणांनी सध्याच्या ठेकेदाराला सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली.
दरम्यान, १० जुलैपर्यंत नवीन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर निविदांची (Tenders) छाननी आणि निवड प्रक्रिया सुरू असतानाच वॉटग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे आता संपूर्ण प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून आहे. या प्रकरणात २५ जुलै व १ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. १ ऑगस्टला न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली तर निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात न्यायालयाकडून निर्णय येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाच वर्षांसाठी एक हजार पंचाहत्तर सफाई कामगारांची सेवा आउटसोर्सिंगवर देण्यासाठी हा ठेका महापालिकेकडून दिला जाणार आहे. मात्र, ठेक्याची किंमत आणि प्रक्रिया पारदर्शकतेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, २०२० मध्ये महापालिकेने सफाईसाठी ७४ कोटी रुपये खर्च केले होते. केवळ चार वर्षांत हा खर्च तीनपट वाढला असल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
सुनावणीत मनपाने आपली बाजू मांडली आहे. न्यायालयाकडून निर्णय झाल्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे.
अजित निकत, संचालक, घनकचरा विभाग, मनपा





