नाशिक । कुंदन राजपूत
नाशिककरांची हक्काची मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडला पळविण्यात आली असून रेल्वे प्रशासनाचा या काराभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी तपोवन एक्स्प्रेसदेखील नांदेडला पळविण्यात आली आहे. रेल्वेच्या या मनमानी कारभाराविरोधात लोकप्रतिनिधी लढा उभारणार आहेत.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून नाशिकवर अन्याय होत असल्याचा आरोप होत होता. महत्त्वाचे प्रकल्प विदर्भ व मराठवाड्याला पळवत नाशिकचे खच्चीकरण सुरू असल्याचे आरोप नवे नाहीत. नाशिकहून मुंबईला रोज हजारो प्रवासी कामाधंद्यासाठी ये-जा करतात. त्यांच्यासाठी पंचवटी, राज्यराणी या दोन एक्स्प्रेस लाईफलाईन आहेत.
इंटर सिटी ट्रेन या अंतर्गत नाशिक-मुंबई मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. पंचवटी एक्स्प्रेसला समांतर रेल्वे सुरू करण्याची मागणी होती. त्यामुळे मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र, या एक्स्प्रेसला तोटा होत असल्याची सबब रेल्वेकडून सातत्याने पुढे केले जात आहे.
नांदेडचे भाजपचे खा. प्रताप चिखलीकर यांनी तोटा दूर करण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेस नांदेड-मुंबई करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली. या प्रस्तावास गोयल यांनी तत्काळ मंजुरी दिली. या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. यापूर्वी देखील नाशिक-मुंबई तपोवन एक्स्प्रेस नांदेडला पळविण्यात आली.
राज्यराणीचा सध्याचा मार्ग
मनमाड-नाशिक-इगतपुरी-कसारा-कल्याण-ठाणे-सीएमएसटी
असा असेल नवा मार्ग
नांदेड-जालना-औरंगाबाद-मनमाड पुढे नाशिकमार्गे मुंबई
प्रवाशांची मागणी
राज्यराणीचा मार्ग मनमाड-मुंबई असाच हवा तोट्यातून बाहेर येण्यासाठी दादरला थांबा द्य राज्यराणीच्या परतीच्या वेळेत बदल करा सायंकाळी पंचवटीच्या अर्धा तासाने राज्यराणी सुटते. हा वेळ एक तासाने वाढवा सेवाग्राम व नंदीग्राम एक्स्प्रसेला पर्याय उपलब्ध होईल.
आधीचा प्रयत्न हाणून पाडला
सन 2018 मध्ये राज्यराणी नांदेडला पळविण्याचा घाट रचण्यात आला होता. त्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रवाशांनी वज्रमूठ उभारत हा प्रयत्न हाणून पाडला होता. आता पुन्हा एकदा लढा उभारला जाईल.
– राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती
प्रवाशांची मागणी
राज्यराणीचा मार्ग मनमाड-मुंबई असाच हवा तोट्यातून बाहेर येण्यासाठी दादरला थांबा द्य राज्यराणीच्या परतीच्या वेळेत बदल करा सायंकाळी पंचवटीच्या अर्धा तासाने राज्यराणी सुटते. हा वेळ एक तासाने वाढवा सेवाग्राम व नंदीग्राम एक्स्प्रसेला पर्याय उपलब्ध होईल.
खासदारांचे म्हणणे काय?
खासदार हेमंत गोडसे :-
राज्यराणी नांदेडला पळविण्याचा हा घाट आहे?
राज्यराणी ही इंटर सिटी एक्स्प्रेस आहे. दोन शहरांना जोडणे हा तिचा उद्देश. राज्यराणी नांदेडला नेली तर मूळ उद्देशच हरवला जाईल.
राज्यराणी तोट्यात आहे का?
राज्यराणी एक्स्प्रेस तोट्यातून बाहेर यावी, यासाठी तिला दादरला थांबा दिला जावा. जेणेकरून प्रवासी संख्या वाढेल. तीन वर्षांपासून ही मागणी आम्ही करत आहोत.
राज्यराणीसाठी लढा उभारणार का?
राज्यराणी नांदेडला नेण्यास आमचा विरोध आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहोत. 2018 मध्येदेखील राज्यराणी नांदेडला पळवून नेण्याचा डाव हाणून पाडला होता.
खा. प्रताप चिखलीकर : –
राज्यराणी नांदेडला नेण्याचा अट्टहास का?
सद्यस्थितीत नांदेडहून थेट मुंबईसाठी एकही एक्स्प्रेस नाही. नांदेड येथील गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांची राज्यराणीमुळे सोय होईल. तसेच प्रवासी वाढल्याने तोट्यातून बाहेर येण्यास मदत होईल.
मुंबई-नांदेड स्वतंत्र रेल्वेची मागणी का नाही?
रेल्वेमंत्र्यांकडे मुंबई-नांदेड स्वतंत्र एक्स्प्रेसची मागणी केली होती. मात्र, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही.
नाशिकच्या प्रवाशांचे हाल होतील?
मनमाड ते मुंबई दररोजच्या प्रवाशांचा स्लॉट तसाच राहिल. राज्यराणीला जादा डब्बे जोडले जातील. त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांवर अन्याय होणार नाही, याची नियोजनात काळजी घेतली जाईल.