नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील रस्त्यांत खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते, अशी सध्या परिस्थिती आहे. स्त्यांच्या दुरवस्थेमुळे सामान्य नागरिक त्रासले आहेत. विविध राजकीय पक्षांनी लहान-मोठी आंदोलने केली. तरीदेखील नाशकातील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्यासह रस्तेदुरुस्तीवर मनपाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी फक्त ठेकेदारांना खूश करण्यासाठी होत आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
नाशिक शहरात गेल्या दहा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे मनपाच्या कामांची पोलखोल झाल्याचे दिसत आहे. नाशिककरांकडून कररूपाने मिळणारे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत. साचलेले पाणी आणि रस्त्यातील खड्यांमधून वाट काढण्याच्या दिव्यातून नागरिकांना दररोज जावे लागत आहे. मनपाच्या बांधकाम विभागावर शहरातील खड्डे बुजवण्यासह पाणी साचणारे ठिकाण यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी आहे. मात्र शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह त्यांची टीम फक्त बैठकांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या मनपा आयुक्त मनीषा खत्री विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची आणखी चंगळ सुरू आहे. नागरिक रस्त्यावर भरलेले पाणी आणि पडलेल्या खड्यांमुळे त्रस्त असताना अधिकाऱ्याच्या बैठकांवर बैठकांचा जोर सुरू आहे. दुपारनंतर थेट साईटवर पाहणी करण्याचे कारण देऊन मुख्यालयाबाहेर निघून जात आहेत. तक्रारी घेऊन येणारे नागरिक व नागरिकांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या माजी नगरसेवकांनादेखील अधिकारी दाद देत नाहीत. प्रभारी आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनी बांधकाम विभागाला सूचनाही केल्या. मात्र शहर अभियंत्यांसह बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी व कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांच्या आदेशाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्ते दुरुस्तीसाठी मनपा अर्थसंकल्पात सुमारे १०० कोटीच्या जवळपास तरतूद करण्यात येते. प्रत्यक्षात तसे काम होताना दिसत नाही. रक्कम मात्र खर्च होत आहे. त्यामुळे मनपाच्या बांधकाम विभागाची ठेकेदानांवर मेहेरनजर असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात मनपाने रस्ते दुस्तीसाठी ८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ७० कोटी रुपयांच्या जवळपास खर्च रस्ते दुरुस्तीसह खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आला. तरीही शहराची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे हा पैसा कुठे गेला याचा छडा लागण्याची आवश्यक आहे.
सामान्य नागरिकांच्या कर व इतर मागनि मनपाच्या तिजोरीत पैसा गोळा होतो. मात्र त्यातून मोठ्या प्रमाणात खर्च करूनदेखील शहरातील सत्यांची दुरवस्था कायम आहे. मनपाने केलेला कोटींचा खर्च कुठे केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर पावसाळ्यात नाशिक शहराच्या रस्त्यांवर हजारो खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात होतात. अनेकांना जीव गमावावा लागतो. मनपाकडून पावसाळ्यानंतरही बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. तरीही नाशिकचे रस्ते हवे तसे खड्डेमुक्त न झाल्याने नागरिकांना मनः स्ताप सहन करावा लागत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा