चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
शेतकरी कर्जमाफीसह (Farmer Loan Waiver) अन्य मागण्यांसाठी मुबंई-आग्रा महामार्ग (Mumbai-Aagra Highway) चांदवड चौफुलीवर प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर (Ganesh Nimbalkar) यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी बांधवांनी आज (गुरुवार) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अन्नत्याग आंदोलन करून, एकशे पंचवीस किलोमीटर पायी यात्रा काढून सरकारला इशारा देत आहे.तर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयावरती हजारो ट्रॅक्टरसह बिऱ्हाड घेऊन मंत्रालयावरती धडक देणार आहे. याच धर्तीवर आज नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) चांदवड येथील मुंबई-आग्रारोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांदवडच्या प्रचारसभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असा शब्द दिला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारला त्यांच्या शब्दांचा विसर पडला आहे, अशा या शेतकरी विरोधी सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने चक्काजाम आंदोलन सुरू केले असल्याचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनात कृषीमंत्री माणिकराव कोकटेंच्या ( Manikrao Kokate) ‘रमी’च्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी पत्त्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. तसेच महामार्गवर पत्ते फेकण्यात आले. यावेळी चांदवड देवळा मतदारसंघातील शेतकरी तसेच प्रहारचे पदाधिकारी, कार्येकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय अधिकचे पोलीस (Police) बळ देखील मागविण्यात आले होते.





