नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतीचे (Farm) नुकसान होत असताना दुसरीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ४९५ गावातील २ लाख ५४ हजार ८२७ लोकसंख्येसाठी १३९ टँकरद्वारे ३११ टँकरफेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात (District) एकूण ७३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यापैकी गावांसाठी १७ तर टैंकरसाठी ५६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात टँकर फेऱ्या सुरू आहेत. प्रशासनाकडून पाणी पुरवठा करण्यासाठी ३१५ टँकर फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी प्रत्यक्ष ३११ फेऱ्या जिल्ह्यात सुरू आहेत. सर्वाधिक पाणीटंचाई येवला तालुक्यात आहे.
येवला तालुक्यातील (Yeola Taluka) ११७ गावांसाठी ३४ टँकरद्वारे ६५ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी ३९९ टैंकर फेऱ्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदाही टँकर (Tanker) फेऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ ही चारशे फेऱ्यांच्या दिशेने होत असल्याचे चित्र आहे.
धरण समूहात २८ टक्के पाणीसाठा
नाशिक जिल्ह्याची (Nashik District) तहान भागवणाऱ्या धरण समूहात १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा म्हणजे २८.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात ३ हजार ४३१ म्हणजे ३३.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे