नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आम्ही लोकांमध्ये (People) राहतो, विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी कुठे गेल्यावर लोक आमच्याकडे खड्ड्यांच्या त्रासाच्या तक्रारी करतात, मात्र मनपा प्रशासनातील (NMC Administration) अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत शासनाच्या नियमांप्रमाणे शहरातील खड्डे (Pothole) येत्या १५ दिवसांत बुजविण्यात यावे, अन्यथा आगामी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची तंबी शहरातील तिन्ही भाजप आमदारांनी (BJP MLA) मनपा प्रशासनाला दिली.
मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे, पश्चिमच्या सीमा हिरे व पूर्वचे अॅड. राहुल ढिकले यांनी मंगळवारी (दि. २५) मनपात येऊन खड्डे प्रश्नी विशेष बैठक घेतली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्यासह अति. आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी अधिकाऱ्यांना त्यांनी धाऱ्यावर धरले. संपूर्ण शहरातील (City) सहाही विभागात रस्त्यांची चाळण झाली असून, याबाबत आमदारांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महापालिकेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह सिंहस्थ मेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी बैठक घेतखड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा इशारा दिला होता.
सद्यस्थितीत मनपाकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले तरी ते शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केली जात नसल्याचा आरोप आ. फरांदे यांनी केला. शहरात सद्यस्थितीत विभागांतर्गत भुयारी गटारीची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, भूमिगत एमएनजीएल पाइपलाइन, फायबर कंपन्यांचे केबल नेटवर्किंगची कामे, यामुळे अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच स्मार्ट सिटीमार्फत विकासकामे सुरू असून, त्याअंतर्गत सत्यांचे डांबरीकरण व अस्तरीकरण करण्यात येत आहेत.
दरम्यान, ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आमदारांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत. शहरात विविध कामांसाठी रस्ते खोदकाम केले जाते. एमएनजीएल तसेच इतर यंत्रणांकडून रस्ते खोदकामासाठी शुल्क भरले जात असले तरी खोदकामानंतर योग्य व दर्जेदार दुरुस्ती होत नसल्याचे ही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रस्ते अधिक खराब होतात, वाहतूक कोंडी होते.
पॅचवर्क निकृष्ट
नाशिक महापालिकेच्या वतीने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असली, तरी अनेक ठिकाणी रस्ता तयार करण्यात आल्यानंतर सील कोट न केल्यामुळे काही दिवसांतच ते नादुरुस्त होत असल्याचे निदर्शनास आले. परिणामी रस्ते कामाच्या निधीचाही अपव्यय होत असून, शहरातील वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
तुम्हीच निधी आणून द्या : आयुक्त
भाजप आमदारांनी खड्डे प्रश्नी अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले, मात्र आमच्याकडे निधीच नाही. त्यामुळे कामांची गती पाहीजे तशी नाही. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत असले तरी कॉलनी रस्त्यांसाठी आम्ही प्राकलन तयार करून देतो, तुम्हीच शासनाकडून निधी आणून द्या, अशी मागणी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी आमदारांकडे केली.




