नाशिक | प्रतिनिधी | Nashik
न कळत गरम पाण्याच्या (Hot Water) पातेल्यात बसल्याने गंभीररित्या भाजलेल्या तीन वर्षीय कार्तिक विलास घुगे या बालकाचा (Boy) चौदा दिवसांच्या उपचारानंतर अखेर करुण अंत झाला. ही घटना पाथर्डी फाटा येथील अश्विननगरातील एका नामांकित महाविद्यालया जवळील बांधकामाच्या साईटवर ८ ऑक्टोबर रोजी घडली होती. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात ७ डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्युची (Death) नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरात (Nashik City) विविध कारणांनी सात बालकांचा अकाली मृत्यू झाला आहे.कार्तिक हा ८ ऑक्टोबर रोजी बांधकामाच्या साईटवर खेळत होता. तेव्हा कुटुंबाने बाजूलाच आंघोळ करण्यासाठी गरम पाण्यासाठी तापवलेले पातेले ठेवले होते. याच पातेल्याजवळ कार्तिक खेळताखेळता पोहोचला. न कळत या पाण्यात अचानक बसल्याने तो गंभीररित्या भाजला. तो जिवाच्या आकांताने रडू लागल्यावर कुटुंबाने त्याला सिडकोतील रुग्णालयात दाखल केले.
मात्र, अधिक उपचारार्थ छ. संभाजीनगरातील रुग्णालय (Hospital) व तेथून घाटी येथे दाखल करण्यात आले. शर्थीचे उपचार करुनही अखेर २१ ऑक्टोबर रोजी त्याची प्राणज्योत मालवली. तपास पोलीस नाईक जंगम करत आहेत. या दुर्घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असली तरी पालकांचे बालकांकडे होणारे दुर्लक्ष त्यामागील मुख्य कारण असल्याचे निरीक्षण काही वैद्यकीय अधिकायांसह पोलिसांनी नोंदवले आहे.
मृत्यूचे भय येथे संपत नाही!
मच्छर, डास मारण्याचे लिक्विड पिऊन, गरम पाणी व चहा अंगावर सांडून तसेच पाण्याच्या टाकीत, गरम पाण्याच्या बादलीत आणि हौदात बुडून नाशिकमध्ये सहा बालके दगावली आहेत. पालक वर्गाने बालकांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे. विविध निर्माणाधीन सोसायट्यांतील पाणी व सेप्टिक टाक्या बंदिस्त नसल्याने अशा दुर्देवी घटना घडत असून गेल्या पाच महिन्यांत नाशिक शहरातील विविध निर्माणाधीन सोसायट्यांवर मजुरीचे काम करणाऱ्या सातहून अधिक स्थानिक व परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला आहे. शॉक लागून मृत्यू झाले आहेत, असे पोलीस दप्तरी नोदींतून समोर आले आहे.
फेब्रुवारी ते ऑक्टोबरदरम्यान घडलेल्या घटना
- ६ फेब्रुवारी रोजी जेलरोडच्या कॅनॉल रोड भागात आईच्या कडेवरील दीड वर्षीय ओरान मुसा शेख याने चहाच्या पातेल्याला हात लावल्याने उकळता चहा अंगावर सांडून मृत्यू.
- २७ फेब्रुवारी रोजी उपनगरच्या खर्जुल मळा भागात पाणी साठवणुकीच्या डबक्यात बुडून दोन वर्षीय प्रांजल लहू माने (रा. विजयनगर) या बालिकेचा मृत्यू.
- १० मार्च रोजी दिंडोरी रोडवरील शिंदेवस्तीत दोन वर्षीय आदित्य नवनाथ शिंदे याने डास मारण्याचे औषध (लिक्विड रिफिल) प्यायल्याने उपचारादरम्यान मृत्यू.
- २२ मार्च रोजी अंबड एमआयडीसीत घराजवळ पाणी खेळताना बादलीत तोल जाऊन पडल्याने चार वर्षीय रागनी मनोजकुमार वनवासी या बालिकेचा मृत्यू.
- ६ एप्रिल रोजी निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून अठरा महिन्यांच्या रौनक सुनील कनोजे (रा. लालचंद सोसायटी, एमएसईबी कॉलनीजवळ, जेलरोड) याचा मृत्यू.
- १६ मे रोजी केवल पार्क भागात उकळत्या पाण्यात पडून सव्वा वर्षीय आयुष अविनाश पावरा याचा उपचारादरम्यान मृत्यू.
- ८ ऑक्टोबर रोजी अश्विननगर भागात कार्तिक विलास घुगे याचा गरम पाण्याच्या पातेल्यात बसल्याने मृत्यू.




