नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ग्रामीण पोलिस दलातील (Rural Police Force) भरती प्रक्रियेलेतील मैदानी चाचणीस शनिवारी (दि. २१) प्रारंभ झाला. अत्याधुनिक ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडली. गुणवत्ता, निष्पक्षता आणि तत्काळ नोंद या त्रिसूत्रीवर भर देत प्रशासनाने प्रक्रियेला गती दिली आहे.
भरतीसाठी आडगाव (Aadgaon) येथील अधीक्षक कार्यालयासमोरील कवायत मैदानावर मैदानी चाचणीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १५१९ उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी ४५७ उमेदवार अनुपस्थित राहिले, तर उंची व छाती मोजमाप प्रक्रियेत १०९ जण अपात्र ठरले. यानंतर पात्र उमेदवारांनी १०० मीटर, १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक या चाचण्या दिल्या. धावण्याच्या स्पर्धेत आरएफआयडी प्रणालीद्वारे गुण तत्काळ संगणकात नोंदविण्यात आले. प्रत्येक गुणनोंदीनंतर उमेदवारांची स्वाक्षरी घेण्यात आली.
दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत असून, गुणांसह तपशील फलकावर प्रदर्शित करण्यात येत आहेत. ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार २१० शिपाई, ५२ चालक आणि कारागृह विभागातील ११८ शिपाई अशा एकूण ३८० पदांसाठी भरती होत आहे. या पदांसाठी तब्बल ९६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सोमवारी (दि. २३) सुमारे तीन हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे.
अधीक्षकांचे ‘मिनी कार्यालय’
मैदानातच संगणक कक्ष, प्रवर्गनिहाय कागदपत्र पडताळणी व्यवस्था, तसेच झेरॉक्स व फोटो केंद्र सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांच्या शंकानिरसनासाठी अधीक्षकांचे ‘मिनी कार्यालय’ कार्यरत असून अपिलांसाठी स्वतंत्र कक्षही उपलब्ध आहे. एका तुकडीत २० उमेदवार अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे सतत सूचना देत शिस्त राखली जात आहे.





