नाशिक | Nashik
एकेकाळी नाशिक (Nashik) हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) बालेकिल्ला होता. पक्ष स्थापनेची घोषणादेखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकमध्येच केली होती. मात्र मागील काही वर्षात पक्षाची अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे आता राज ठाकरे व अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशिकबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२००९ मध्ये नाशिक शहरात तीन आमदार, २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत ४० नगरसेवक व महापौर तसेच सलग पाच वर्ष महापालिकेत एकहाती सत्ता असे चित्र होते. मात्र आता राज्यात मनसेनेचा एकही आमदार नाही तर शहरातील पक्ष संघटना देखील पूर्वीसारखी राहिली नसल्यामुळे नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघटना बांधणीचे मोठे आव्हान वरिष्ठांसमोर आहे. एकीकडे स्वबळावर लढण्याची तयारी, तर दुसरीकडे भाजपच्या काही उमेदवारांना (Candidates) पाठिंबा, लोकसभा निवडणुकीतही भाजपला बिनशर्त पाठिंबा, त्यापूर्वी २०१९ मध्ये भाजपच्या विरोधात प्रचार, अशा वेळोवेळी भूमिका बदलाचा फटकादेखील मनसेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बसल्याची चर्चा रंगत आहे.
मनसेनेने राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) १२५ तर जिल्ह्यात चार व शहरात तीन उमेदवार उभे केले होते. शहरातील पूर्व व पश्चिमसह देवळाली मतदार संघात पक्षाचे उमेदवार उभे होते. राज ठाकरे यांच्या दोन सभा देखील पश्चिम मतदार संघात झाल्या होत्या. तरी अपेक्षित यश मिळालेले नाही. नाशिक मध्यचे उमेदवार अंकुश पवार यांनी आधीच माघार घेतली होती. नाशिक पश्चिममध्ये दिनकर पाटील यांनी ४६ हजारांपेक्षा जास्त तर इगतपुरी मतदारसंघात काशीनाथ मेंगाळ यांनी २० हजारांपेक्षा जास्त मते घेऊन काही प्रमाणात प्रतिस्पर्थ्यांना चांगली झुंज दिली, मात्र नाशिक पूर्व आणि देवळालीत तशी कामगिरी झाली नाही. त्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकने विधानसभेच्या निवडणुकीत तरी मनसेनेला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा परिणाम आगामी महापालिका (Municipality) तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर देखील होण्याची शक्यता लक्षात घेता त्वरित पक्षाच्या वरिष्ठांना डॅमेज कंट्रोलसाठी पावले उचलावी लागणार आहेत.
मोठे बदल हवे
मागील काही काळापासून स्थानिक पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल झालेले नाहीत. वेळोवेळी किरकोळ स्वरूपाचे बदल करण्यात आले. त्यामुळे अनेक नवीन व जुने कार्यकर्ते नाराज दिसत आहेत. नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक व माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी थेट भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तो देखील एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात शहरासह जिल्ह्यातील तसेच विद्यार्थ्यांसह विविध आघाड्यांवरील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा