नाशिक | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज (दि.२) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. यावेळेत उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत सूचक अनुमोदक यांनी प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहून माघारीचे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. दरम्यान, माघारीची वेळ जवळ येत असल्याने विविध राजकीय पक्षांच्या बैठकांना, अंतर्गत चर्चाना आणि समन्वय बैठकींना सुरुवात झाली आहे.
यंदा महापालिका निवडणुकीसाठी शहरातील सर्व प्रभागांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी बहुरंगी आणि चुरशीच्या लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात कायम राहणार, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्ष कार्यालये, नेत्यांची निवासस्थाने तसेच विविध ठिकाणी बैठका सुरू आहेत. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, काही प्रभागांत उमेदवारांना माघारीसाठी विनंती केली जात आहे. माघारीच्या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माघारीचे अर्ज स्वीकारले जात आहेत. उमेदवाराची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असून, उमेदवार अनुपस्थित असल्यास त्यांचा सूचक किंवा अनुमोदक माघारीचा अर्ज सादर करू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. ठरलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत माघार स्वीकारली जाणार नसल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज दुपारी तीननंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, त्यानंतर ३ जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे स्पष्ट चित्र समोर येणार असून, अनेक प्रभागांत थेट आणि अटीतटीच्या लढती रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




