चांदवड | Chandwad | वार्ताहर
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ (Minister Sanjay Shirsat) हे सध्या देवदर्शन करत असून, काल (रविवारी) त्यांनी शनिशिंगणापूर येथे शनीदेवाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज (सोमवारी) चांदवड (Chandwad) येथील जैन समाजाच्या णमोकार तीर्थक्षेत्राला शिरसाठ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
यावेळी चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल (Bhushan Kasliwal) यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या भव्य पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवासंदर्भात भूषण कासलीवाल यांनी मंत्री शिरसाठ यांना माहिती देत याठिकाणी भाविकांना रस्ते, पाणी, वीज, निवास व्यवस्था यासह आदी बाबतीत येणाऱ्या अडचणींबाबत सरकारकडून सहकार्य मिळावे यासाठी साकडे घातले. त्याला मंत्री शिरसाठ यांनी देखील दुजोरा दिला आहे.
त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. यावेळी सध्या आपल्यावर आलेल्या संकटामुळे देव दर्शन घेताय का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला. त्यावर उत्तर देतांना शिरसाठ म्हणाले की, “राजकारणात (Political) चढ उतार नसतील तर राजकारण काय कामाच, म्हणून मी त्याला सकारात्मक घेत असतो. संकटे येणार नसतील, आले तर ते कोणी आणले याला सामोरे जाण्याची तुमच्यात ताकत असली पाहिजे. त्यामुळे या संकटांना घाबरणारा माणूस नाही. संकट आले तर घाबरून इकडे तिकडे पाळणारा मी माणूस नाही, साकडे वगैरे काही घालत नाही. आशीर्वाद सर्वांचे असले पाहिजे, आशीर्वादाच्या जोरावर याठिकाणी पोहोचलो आहे. असे त्यांनी म्हटले.
तसेच “माजी आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांनी शिरसाठ यांचा राजीनामा (Resignation) मागितला आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर बोलतांना ते म्हणाले की, “जलील बिलील काही नाही असे अनेक जलील गाडले” असे म्हटले. तर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते राडा आणि माणिकराव कोकाटे यांच्या जंगली रमीच्या व्हिडीओवर बोलतांना मंत्री शिरसाठ यांनी मात्र टाळले.




