नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) घोटाळ्याचा भांडाफोड केला आहे. मतचोरीमुळेच विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) निकाल हे केवळ महाविकास आघाडीसाठीच नव्हे, तर महायुतीसाठीसुध्दा धक्कादायक असल्याचे सांगत महायुतीच्या मंत्रिमंडळातील (Mahayuti Cabinet) मंत्र्यांवर जनतेचा रोष असल्यानेच जनता आता विरोधी पक्षाकडे आशेने पाहत असल्याचे शिवसेना ठाकरे गट तथा युवासेनेचे सचिव आ. वरुण सरदेसाई यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकला घेण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, बैठकीच्या (Meting) माध्यमातून संघटनेचे कामकाज कसे सुरू आहे याबाबत आढावा घेतला जात आहे. नाशिकसह अन्य ठिकाणी देखील आमच्याच पक्षाचे नगरसेवक निवडून येतील आणि महापौर आम्हीच ठरवू, असा दावा सरदेसाई यांनी केला. तर मुंबईतील कबुतरखान्याचा विषय मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच उपस्थित केला. जैन लोक भाजपला मतदान करतात मात्र, कबुतर खान्यासंदर्भातील घटनेमुळे जैन समाजाचा भाजपकडून भ्रमनिरास झाला आहे. आंदोलनावेळी काही लोकांनी हाती शस्त्र घेतले. त्याच जागी मुस्लीम समाज असता तर त्यावर मोठ्या प्रमाणात आगपाखड झाली असती. मात्र, जैन समाजातील लोकांवर काही बोलले गेले नाही कारण हा समाज त्यांचा मतदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच मांस विक्री बंदी संदर्भात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने निर्णय घेतला म्हणजे एकट्या भाजपची अशा प्रकारची विचारसरणी ही देशाची होऊ शकत नसल्याचे सांगत आमदार वरुण सरदेसाई यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला.
मेरिट पाहूनच संधी
गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बनावट मतदान कार्ड (Voter Card) तयार करून बोगस मतदान झाले आहे. यामुळे अनेक धक्कादायक निकाल लागले असून, मी स्वतः यासंदर्भात मतदार यादीची छाननी घेऊन सविस्तर माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगले संघटन कार्य करणाऱ्या नवीन सहकाऱ्यांना संधी देण्यात येणार असून, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित निवडी केल्या जाणार आहेत. निवडणुकीत युवा ब्रिगेडला संधी देताना प्रत्येकाच्या कामकाजाचे मेरिट बघितले जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले.




