नाशिक | फारूक पठाण | Nashik
मुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात काही ठिकाणी महायुती (Mahayuti) तर काही ठिकाणी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local Body Election) लढण्याचे नुकतेच संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते छगन भुजबळ यांचा आज मंत्रिमंडळात समावेश झाल्याने आगामी नाशिक मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का? अशी चर्चा रंगली आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ज्येष्ठ ओबीसी नेते, अनुभवी प्रशासक आणि नाशिकच्या मातीतील खंबीर नेते आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा आगामी नाशिक मनपा निवडणुकीवर (Nashik NMC Election) मोठा परिणाम होणार हे निश्चित आहे. भुजबळांचा जनाधार आणि शहरावरचा प्रभाव निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तिन्ही पक्षांत सध्या रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते, कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे पालकमंत्री होण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व शिक्षणमंत्री दादा भुसेदेखील इच्छूक आहेत. मात्र, भाजप पालकमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला द्यायला तयार नाही. जिल्ह्यात भाजपचे ५ आमदार असूनही पक्षाने त्यातील एकालाही मंत्रिपद दिलेले नाही. त्यामुळे भाजप पालकमंत्रीपद घेणार हे पूर्वीच निश्चित झाले होते.
त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नेमणूकही करण्यात आली होती. नंतर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली. भाजपचे संकटमोचक व मुख्यमंत्र्यांचे जवळचे असलेल्या महाजन यांचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळीही मनपा निवणुकीची तयारी दिसून आली. तिरंगा यात्राही नाशिकमध्ये महाजन यांच्या नेतृत्वातच निघाली. २०१७ ची मनपा निवडणूक भाजपने स्वतंत्र लढवून मनपा इतिहासात पहिल्यांदा ६६ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता काबीज केली होती. त्यावेळीही मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री महाजन होते. तसेच शहरातील चारपैकी मध्य, पूर्व व पश्चिम या तीन ठिकाणी भाजपचे आमदार होते. ते आताही तसेच आहेत. म्हणून आगामी मनपा निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने इतर पक्षांनी त्याच पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, भुजबळ मंत्री झाल्याने आता राष्ट्रवादीची (NCP) देखील स्वबळाची तयारी करीत असल्याचे जाणवत आहे. महाविकास आघाडीतदेखील अशीच चर्चा रंगत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा दिला होता. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी महाविकास आघाडी राहणार; मात्र ज्या ठिकाणी जो पक्ष मजबूत तो पक्ष तेथे निवडणूक स्वबळावर लढेल, असे संकेत दिले होते. स्थानिक पातळीवर नेते व कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते. म्हणून युती व आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर केला जातो.