नाशिक | रवींद्र केडिया | Nashik
तळागाळातील शिवसैनिकांच्या मनात आजही ‘शिवसेना’ (Shivsena) ही एक भावनिक ओळख आहे, जी सहज पुसता येत नाही. सध्या नाशिकमध्ये (Nashik) सुरू असलेल्या पक्षांतराच्या मालिकेमुळे उबाठा पक्षासमोरील आव्हान वाढले असले तरी पक्षबांधणीसाठी ‘ज्येष्ठांचा अनुभव’ आणि ‘तरुणांचा उत्साह’ यांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सद्यस्थितीत उबाठा पक्षाला राजकीय (Political) आघातांची सवय झाली आहे. मात्र, त्यातून शिकून पुन्हा उभे राहण्याची ताकद तळागाळातील शिवसैनिकांमध्ये आहे. याच भूमिकेचा फायदा घेत नाशिकमधील उबाठा पक्ष नव्या ताकदीने पुढे येऊ पाहत आहे. आज उबाठा पक्षाला नेतृत्वाने विश्वासार्हता टिकवून, संघटनेला नवा जोम देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय मैत्रीपूर्ण संवादामुळे उबाठा पक्षात नवचैतन्य संचारल्याचे चित्र सध्या नाशिकमध्येही (Nashik) दिसून येत आहे.
पक्षांतरे अन् संभ्रमाचे सावट
उबाठा पक्षाने नाशिकच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र कालांतराने वसंत गिते, सुनील बागुल, दशरथ पाटील, बबन घोलप यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने ही अस्थिरता अधिकच वाढवली. तरीही ज्येष्ठ शिवसैनिकांनी संयम राखत आणि एकत्रित बांधणी करत कार्यकर्त्यांचे मोहोळ अबाधित ठेवल्याचा इतिहास आपण अनुभवला आहे. या विविध घटनांतून नेतृत्व भलेही बदलत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये पक्षाची नाळ अजूनही घट्ट आहे, हे अधोरेखित झाले आहे.
युवकांवर विश्वास, नेतृत्वात नवा चेहरा
गेल्या काही महिन्यांतील घडामोडींमुळे काही पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येतो आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या खांद्यावर नाशिक महानगरातील जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासारख्या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षात नवसंजीवनी निर्माण होण्याची शक्यता आहे. पक्षांतरे ही उबाठा पक्षासाठी नवी बाब नाही, पण कार्यकर्त्यांच्या मनातील निष्ठा अजूनही शाबूत आहे.
मनोमिलनाचा प्रभाव, संभाव्य नवा अध्याय
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनामुळे नाशिकसह महाराष्ट्रभर उबाठा पक्षामध्ये उत्साह संचारला आहे. या दोघांच्या एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यास शिवसैनिक व मनसैनिक यांची मोट बांधली जाऊ शकते आणि त्यातून नव्या राजकीय पर्वाची सुरुवात होऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील ‘आनंद मेळाव्या’त याचे सूतोवाचही झाले आहे.
ज्येष्ठांची साथ, विचारधारेला पाठबळ
वसंत गिते, विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, जयंत दिंडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आजवर शिवसेनेची विचारधारा टिकवून ठेवली आहे. आता त्यांच्यावर नव्या नेतृत्वाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांचा अनुभव युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतो.
नातं फक्त राजकीय नव्हे भावनिकही
उबाठा पक्षाची ताकद ही संघटनात्मक क्षमतेपेक्षा भावनिक सलगीत अधिक होती. सध्या पक्ष ज्या टप्प्यावर आहे, तिथे संघटना बळकट करणे, संवाद वाढवणे आणि तळागाळाशी नाते जोडणे हेच खरे शस्त्र ठरणार आहे. नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या मनात पुन्हा आत्मियता निर्माण केली तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला नाशिकमध्ये नव्याने उभे राहण्यात अडथळा ठरणार नाही.





