नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एका फेसबुक व्हिडिओसंबंधी (Facebook Video) उबाठा गटाचे तत्कालीन उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांच्यासह मामा रान राजवाडेंविरुद्ध उठवणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता गजू घोडके (Gaju Ghodke) याने खोटी फिर्याद दिल्याचे उघड झाले आहे. कारण घोडके याने भद्रकाली पोलिसांना (Bhadrakali Police) लेखी पत्र सादर करून प्राणघातक हल्ला व चोरी झालीच नसल्याची कबुली देत दागिने घरातच सापडल्याचे सांगून केवळ काही संशयितांनी दुखापत केल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे आता सुनील बागुलांसमोरील अडचणींचा डोंगर हटला असून त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.
विशेष म्हणजे बागुल यांनी अटकपूर्व जामिनासाठी (Anticipatory Bail) दाखल केलेला अर्ज स्वेच्छेने मागे घेतल्याने प्रकरणात वेगळाच द्विस्ट आला आहे. गजू घोडके याने २७ जून रोजी बागुल यांच्याविरोधात व्हिडीओ प्रसारित करुन त्यांच्यावर ईडीने कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर, ३० जून रोजी रात्री बागुल यांच्यासह नाशिक महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) व इतर संशयितांनी हा व्हिडीओ ‘डिलिट’ करण्यासाठी दबाव टाकून मध्यरात्री घरात शिरुन तोडफोड, जबरी चोरी व प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दाखल केली होती.
प्राथमिक तपासानुसार भद्रकाली पोलिसांनी काही संशयितांना अटक केली होती, तर सुनील बागुल (Sunil Bagul) मामा राजवाडे, सागर देशमुख यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तत्पूर्वीच बागूल यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करुन अर्ज दाखल केला. यानंतर भाजपत पुनर्प्रवेश करण्यासाठी उत्सुक असताना, घोडके याने दाखल केलेल्या गंभीर फिर्यादीमुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी ऐन मोसमातच इतरांना प्रवेश देत ‘बागुल गँग’ चा प्रवेश वेटिंगवर टाकला. त्यामुळे बागुल पुरते तणावात आले. न्यायालयाकडून अटकपूर्व मंजूर होताच त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. मात्र, सुनावणी, तारीख व न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी वारंवार लांबत गेली. त्यातच घोडके याने प्रकरणात थेट नांग्याच टाकून बागुलांविरोधात तक्रारच नसल्याचे ‘लेखी’ पोलिसांना सादर केले आहे.
बोलविता धनी कोण?
घोडके याने पूर्वी दिलेला जबाब आणि फिर्याद सीसीटीएनएसला अपलोड झाली असून पोलिसांना एफआयआरनुसार दोषारोपपत्र दाखल करावे लागणार आहे. मात्र, आता घोडके याने पूर्वी दिलेली फिर्याद व आताची लेखी नोंद तपास पथक न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे. त्यामुळे खोटी फिर्याद दाखल केल्याचे निष्पन्न झाले तर त्याच्यावर उलटपक्षी गुन्हा दाखल होऊ शकतो व शिक्षा लागू शकते. तर आता ही एफआयआर रद्द करायची किंवा कारवाई काय करायची, यासंदर्भातील आदेश न्यायालयच देणार आहे. त्यामुळे घोडकेच्या अडचणी वाढणार असून त्याला हा उपद्व्याप करण्यासाठी कोणाची ‘बॅकिंग’ होती? यामागचा बोलविता धनी कोण? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.




