संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा संगमनेर या सोयीच्या मार्गाने व्हावा याकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला. या नैसर्गिक रेल्वेमार्गाचा सर्वे होऊन शेतकर्यांना सुमारे 360 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्याने हा मार्ग बदलला गेला. हा मार्ग पुन्हा संगमनेर मार्गेच व्हावा याकरीता माजी मंत्री थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका एकवटला असून लाखो विद्यार्थी व नागरिक मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे या मार्गाची मागणी करणार आहे.
‘अभी नही, तो कभी नही’ हे ब्रीदवाक्य घेऊन आमदार तांबे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा लढा तीव्र करण्यात आला. या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घारगाव याठिकाणी घेण्यात आली. तसेच माजी मंत्री थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हा मार्ग संगमनेरवरूनच व्हावा याकरीता 15 डिसेंबर, 2025 रोजी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
खरेतर संगमनेरवरून रेल्वेमार्ग हा नैसर्गिक मार्ग आहे. या मार्गावरील अनेक शेतकर्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले असून त्या शेतकर्यांना 360 कोटी रुपयांची भरपाई सुद्धा देण्यात आली आहे. नियोजित सर्व काम सुरू असताना महायुती सरकार सत्तेवर आले आणि नाशिक, सिन्नर, पुणतांबा, अहिल्यानगर, पुणे असा लांब पल्ल्याचा रेल्वेमार्ग नियोजित करण्यात आला. हा आडमार्गाचा रेल्वेमार्ग कोणाच्याही उपयोगाचा नसल्याने या मार्गावरील सर्व नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली.
यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सुद्धा या मार्गाबाबत संसदेमध्ये आवाज उठवला. विविध बैठका, आंदोलनाबरोबर आता संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, युवक, महिला व नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा मार्ग संगमनेरवरूनच व्हावा याकरीता मागणी करणार आहे. याचबरोबर सिन्नर तालुक्यातील जनता सुद्धा 1 फेब्रुवारी रोजी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करणार असून संगमनेर मार्गेच रेल्वे झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.





