नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील अनेक शहरांमध्ये (City) नागरिकांना उन्हाचा चांगला चटका बसत असून, काही भागांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावत आहे.त्यातच गेल्या दोन दिवसापासून शहर परिसरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते. यानंतर काल (सोमवारी) मनमाड आणि मालेगाव परिसरात हजेरी लावली होती.
त्यानंतर आज (मंगळवारी) दुपारी नाशिक शहरासह (Nashik City) ग्रामीण भागात (Rural Area) देखील अवकाळीने हजेरी लावली. यात निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेडा परिसरात अचानक वादळी वारा आणि गारांसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची (Farmer) चांगलीच तारांबळ उडाली.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका पिके आणि काढून ठेवलेल्या शेतमालाला बसला आहे. उघड्यावर काढून ठेवलेला कांदा व गहू भिजला असून, गारपिटीमुळे आंब्याचेही नुकसान झाले. तर इतर पिकांनाही धक्का बसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. दुसरीकडे तप्त उन्हाच्या काहिलीने हैराण असलेल्या नागरिकांना (Citizen) या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज
हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान आज रात्री ८ वाजेदरम्यान नाशिक शहरासह सातपूर व नाशिकरोड परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली, सोसाट्याच्या वाऱ्याने काही ठिकाणी झाडे पडल्याचे वृत्त आहे.