नाशिक | Nashik
येथील अनंत कान्हेरे मैदानावर (Anant Kanhere Ground) (गोल्फ क्लब) आजपासून महाराष्ट्र आणि बडोदा (Maharashtra vs Baroda) या दोन्ही संघांतील चार दिवसीय रणजी सामन्याला सुरुवात झाली आहे. या रणजी सामन्याचे उद्घाटन सकाळी ८.३० वाजता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, सेक्रेटरी कमलेश पिसाळ, सीईओ अजिंक्य जोशी, अतुल जैन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम , जिल्हाधिकारी जलज शर्मा , खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे , सीमाताई हिरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (Nashik District Cricket Association) वतीने या रणजी कंरडकचे (Ranji Karandak) आयोजन करण्यात आले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर नाशिकमध्ये हे रणजी कंरडकचे सामने खेळविले जात आहेत. या सामन्यासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे हे सामने बघण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर पुढील चार दिवस मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
या रणजी करंडकमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) तर बडोद्याचे कृणाल पांड्या (Krunal Pandya) करत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे दोन्ही खेळाडू नाशिकमध्ये रणजी सामन्यासाठी आल्याने क्रिकेटप्रेमींची त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. महाराष्ट्र संघात नाशिकच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला आणि रामकृष्ण घोष यांचा समावेश आहे. तर बडोदा संघात कर्णधार कुणाल पांड्यासह विष्णू सोळंकी, नित्या पांड्या, अभिमन्यू सिंग राजपूत, शाश्वत रावत या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, या सामन्यासाठी (Match) अंपायर म्हणून क्रिशनेंदू पाल (बंगाल) व निखिल पटवर्धन (इंदोर) हे जबाबदारी पार पाडणार आहेत. तसेच बीसीसीआयचे गुणलेखक म्हणून केतकी जामगावकर व किशोर लवाणे हे दोघे काम बघतील.तर बीसीसीआयचे व्हीडीओ विश्लेषक म्हणून नाशिकचे सागर देशमुख यांना सदानंद प्रधान साथ देणार आहेत.