त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त (Sant Nivruttinath Maharaj Yatra) डोक्यावर तुळशीवृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद अशा उत्साहपूर्ण वातावरणात विविध शहरातून निघालेल्या दिंड्या त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) दिशेने मार्गस्थ झाल्या होत्या. आज (बुधवारी) पहाटे पौषवारी निमित्त येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात शिक्षणमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी दिंडोरी तालुक्यातील गणपत गाडेकर आणि त्यांच्या पत्नीला पूजेचा मान मिळाला.
यावेळी माध्यमांशी बोलतांना भुसे म्हणाले की, “पौषवारी निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. राज्यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो, अशी प्रार्थना केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार असून, त्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी म्हटले. तसेच वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ घेतला जाईल, असेही भुसे यांनी नमूद केले.
यात्रोत्सव कालावधीत त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) पाच लाख भाविक (Devotee) येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, सुमारे ६०० दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. कालपासूनच सेवेकर्यांच्या माध्यमातून या वारकर्यांच्या सेवेसाठी विविध खाद्यपदार्थ व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच काही सामाजिक संस्थांकडून विविध ठिकाणी केळी, साबुदाणा खिचडी, उपवासाचे वेफर्स वाटले जात आहेत.
दरम्यान, यावेळी अनिता भुसे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव श्रीपाद कुलकर्णी, संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे, संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, पुजारी जयंत महाराज गोसावी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.




