नवी दिल्ली | New Delhi
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या (Shri Ram Temple) मुख्य शिखरावर सोमवारी कलश (Kalash) स्थापित करण्यात आला. पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात सकाळी ही प्रक्रिया संपन्न झाली. यासोबतच मंदिर निर्मितीच्या कार्यातील अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याचेही बोलले जात आहे.
मुख्य शिखरावर कलशस्थापनेसाठी आयोजित सोहळ्यामुळे सोमवारी संपूर्ण अयोध्येत उत्सवाचे वातावरण होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीदिनाच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
सकाळी सव्वानऊ वाजता शिखरावर कलशस्थापनेच्या कार्याला प्रारंभ झाला.मंदिराचे पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चाराच्या तसेच श्रीरामाच्या जयघोषात सव्वातासाच्या कालावधीत कलशाची स्थापना पूर्ण झाल्याचे राय म्हणाले. आता या मुख्य शिखरावर ध्वजदंड स्थापनेची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार असल्याचे राय यांनी सांगितले. मंदिर निर्माणचे काम प्रगतिपथावर आहे. मंदिर परिसरात (Temple Area) असलेल्या बांधकाम मशिनरीही हटविल्या जाणार आहेत.
दरम्यान, याशिवाय, या परिसरातील राजा राम व सप्तऋषींच्या मंदिरातील मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे राय यांनी सांगितले. सर्व काम नियोजित वेळेत पूर्ण होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही आनंद व्यक्त केला आहे. मंदिर निर्माण केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सांस्कृतिक व सामाजिक एकतेचेही प्रतीक असल्याचे म्हणत योगींनी मंदिर ट्रस्टचे व निर्माण कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले.