नवी दिल्ली | New Delhi
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjeev Khanna) हे १३ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर आता त्यांच्याजागी सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील (Maharashtra) पुत्र भूषण गवई विराजमान होणार आहेत. गवई हे १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) संजीव खन्ना यांनी आज (बुधवारी) केंद्रीय कायदा मंत्रालयाला भूषण गवई यांना सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली.
धनंजय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता भूषण गवई (Bhushan Gavai) हे सरन्यायाधीश होणार असून, ते देशाचे ५२ वे सरन्यायाधीश असतील. जवळपास सहा महिने गवई या पदावर असणार आहेत. गवई हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असणार आहे. याआधी न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन पहिले दलित मुख्य न्यायाधीश बनले होते.
दरम्यान, भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात (Amravati District) २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायमूर्ती दिवंगत बारिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. गवई हे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते. यानंतर आता ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत.