नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsson Session) आज (दि.२१) पासून सुरूवात होत आहे. अनेक मुद्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याबाबत केलेल्या दाव्यावर सभागृहात चर्चा करण्यास केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. विरोधकांची मागणी मान्य करताना ही चर्चा संसदेच्या नियमांच्या चौकटीतच केली जाईल, असे सांगून सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्र सरकारने (Central Government) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. दीड तास चाललेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांचा दावा, बिहारमधील (Bihar) मतदार याद्या आदी अनेक मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
विरोधकांच्या मागणीनुसार सिंदूरसह प्रमुख मुद्यांवर संसदेच्या सभागृहात चर्चा करण्यास सरकार तयार आहे. त्याबाबत बैठकीत निर्णय झाला आहे. सर्वच मुद्यांवर संसदेच्या नियमांनुसारच चर्चा होईल, सरकार कोणत्याही चर्चेपासून मागे हटणार नाही, असे रिजिजू यांनी सांगितले. बैठकीत सर्व राजकीय पक्षांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. संसद सुरळीत चालवण्यासाठी सकारात्मक सहकार्य विरोधी पक्षांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची संसदेत उपस्थिती आवश्यक असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यावर पंतप्रधान मोदी चर्चेत भाग घेत नसले तरी ते संसद भवनात नेहमीच उपस्थित असतात, असे रिजिजू म्हणाले. संसदेचे कामकाज सुचारू पद्धतीने चालावे ही सरकार आणि विरोधी पक्ष अशी दोघांचीही जबाबदारी असते. अनेक लहान पक्षांना संसदेत बोलण्याची पुरेशी संधी मिळत नाही. त्याकडे लक्ष दिले जाईल, असेही रिजिजू यांनी सांगितले.
सतरा विधेयके मांडणार
केंद्र सरकारने आतापर्यंत सतरा विधेयके तयार केलेली असून ती संसदेच्या पटलावर मांडली जाणार आहेत. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारकडून चर्चेदरम्यान दिली जातील, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
शर्माविरोधात महाभियोग
भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याच्या महाभियोग प्रस्तावावर देशातील १०० हून अधिक खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती किरण रिजिजू यांनी दिली.
ट्रम्प यांचा दावा केंद्रस्थानी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात आपण मध्यस्थी करून युद्ध थांबवले, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. त्यावर आक्षेप घेताना पंतप्रधानांनी याबाबत संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सरकार यावर संसदेत उत्तर देईल, असे रिजिजू यांनी सांगितले.
विरोधकांचे मुद्दे
- पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सुरक्षेतील त्रुटींची चौकशी.
- बिहारमधील मतदार यादी सुधारणा प्रक्रियेतील अनियमितता.
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर पंतप्रधानांचे स्पष्टीकरण.
- मणिपूर राज्यातील परिस्थितीवर संसदेत चर्चा व्हावी.




