कोल्हापूर | Kolhapur
मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय चर्चाना सुद्धा वेग आला होता. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नविद मुश्रीफ यांच्या नावाला अंतर्गत विरोध करण्यात आला होता. पण आता अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काही दिवसांपासून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण, अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत हस्तक्षेप करत अध्यक्ष महायुतीचाच असावा, असा आग्रह धरला होते. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील, विनय कोरे तसेच गोकुळच्या सत्ताधारी संचालकांच्या बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते. तो लिफाफा आज खोलण्यात आला. यानंतर नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
अध्यक्षपद निवडण्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतरच राजीनामा देऊ, अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली होती. तर, मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगू व डोंगळेंसह सगळ्यांना मान्य होईल असा अध्यक्षपदाचा चेहरा ठरवल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने ‘तो’ चेहरा कोण? याविषयी उत्सुकता लागली होती. महायुती म्हणून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले यांच्या नावाची चर्चा होती. विश्वास पाटील हे इच्छुक नाहीत, तर ‘नविद’ अध्यक्ष होणार नाही, हे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते.
कोल्हापूरच्या सत्ता केंद्रांच्या चाव्या मुश्रीफांच्या घरात
कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत. दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट चुलीशी जोडला गेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढाऱ्यांना हवीच हवी असते. राज्यात महायुती असल्याने सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्येच कोंडी करण्याचा सुद्धा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील राजकारण सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अरुण डोंगळे यांचे बंड शांत करण्यात आले तरी महाडिक गटाच्या कोल्हापूर-मुंबई फेऱ्याही सुरु होत्या. त्यामुळे गोकुळमध्ये वेगळे काही घडणार का? अशीही चर्चा रंगली. मात्र, संचालकांनी एकजूट दाखवल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा