अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नवरात्रोत्सवासाठी मंडळांना मंडप उभारणीच्या परवानग्या देण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला असून, गुरूवारपर्यंत 9 मंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत.
शहरात गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी सुमारे 25 ते 30 मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात. त्यांना मंडप उभारणीच्या परवानग्या महापालिकेकडून दिल्या जातात. त्यासाठी अतिक्रमण निर्मूलन विभागात एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. यात नगररचना विभाग, अग्निशमन विभाग, शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी अर्ज घेऊन तेथेच ना हरकत दाखले दिले जात आहेत. त्यानंतर तत्काळ परवानगी दिली जात आहे. आत्तापर्यंत 9 मंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मंडळांना मनपाच्या मंडप उभारणीच्या परवानगीसह पोलीस प्रशासनाकडूनही स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे. त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यात ही परवानगी दिली जात आहे.