बारामती | Baramati
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) पक्ष सोडून अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मागील तीन महिन्यांपासून राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “नाराजीच्या चर्चेवर काल जयंत पाटील यांनी बारामतीतच भाष्य केले आहे आणि आज तुम्ही ते छापलंही आहे”, असे त्यांनी म्हटले. तसेच राज्यातील काही ठिकाणची परिस्थिती बिघडली असून काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला.सत्तेचा गैरवापर होत असेल तर सरकारने याची दखल घ्यायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो. पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती सर्व राजकारण्यांसोबत घेऊन धरून चालणारा बीड जिल्हा होता. परंतु जिल्ह्यातील काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, त्याचा दुष्परिणाम दिसत आहे. त्यामुळेच तेथे अशी परिस्थिती झाली आहे. राज्य सरकारने (State Government) याकडे लक्ष दिले पाहिजे, फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. कायदा हातात घेणारा जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. बीडमध्ये पूर्वीचे दिवस कसे येतील ते पाहवे, असेही शरद पवार यांनी म्हटले.
तर ‘मल्हार झटका’ मटणाच्या मुद्यावरूनही शरद पवार यांनी सरकारला सुनावले. ते म्हणाले की,”राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? हे राष्ट्रीय प्रश्न नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच एआयचा वापर करू पिक घेतली जात असून एआयमुळे ऊसाला पाणी कमी लागेल. एआयचा (AI) कृषी क्षेत्रात वापर करणार असून त्याची कृषी क्षेत्राला मोठी मदत होत आहे”, असेही पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांनी लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आल्याबद्दल आभार मानले आहे. तसेच तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले असे गौरद्वगार पवार यांनी काढले आहे.