मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका आता एकाच टप्प्यात पार पडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे नागपूर अन् चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील. यासाठी राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे. यासाठी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडू शकते. त्यानुसार, पुढील दोन दिवसात आयोगाकडून याबाबतची घोषणा होईल. १५ तारखेनंतर राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. २९ महापालिकेसाठी १२ जानेवारीनंतर मतदान होईल अन् दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो.
यापूर्वी, राज्यातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकांमध्ये असलेले आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत आहे. त्यामुळे या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आणल्यानंतरच निवडणूक घोषित केली जाईल, असा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात होता. यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता होती.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा महापालिकांमध्ये निवडणूक घेऊ नका, असे निर्देश न्यायालयाने कुठेही दिलेले नाहीत. आणि त्यातच सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीच्या आत राज्यातील निवडणुका पार पाडा असे निर्देश दिले असल्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा बाजूला ठेवून, संबंधित महापालिकेत निवडणूक प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते, अशी माहिती समजत आहे.
निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय. राज्यात १५ डिसेंबरनंतर कधीही महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप, काँग्रेस अन् ठाकरेंकडून महापालिकेतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत. भाजपने महत्त्वाच्या महापालिकेत सर्वेक्षणही केलेय.
राज्यात अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील २० जिल्हा परिषदेतील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. २१ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे एका खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे.
राज्य निवडणूक आयोग १५ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या महानगर पालिकांचा समावेश आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




