आश्वी|वार्ताहर|Ashvi
संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारात असलेल्या लोणी -संगमनेर रस्त्यावरील हॉटेल गोविंदच्या गोदामामध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी चोरीला विरोध करण्यास गेलेल्या हॉटेल कामगाराला चोरट्यांनी जखमी केले. माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. तर सहा चोरटे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात लखन उर्फ लक्ष्मण संपत खरात यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास हॉटेल गोविंदमध्ये कामगारांना जेवण बनवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी हॉटेलच्या मागे असलेल्या गोदामामधून आवाज आला. त्यामुळे कामगार मोहित पंडित याला काय झाले ते पाहण्यासाठी पाठवले. पाठीमागे गेलेला मोहित पंडित हा धावत आला व गोदामाच्या खिडकीचे ग्रिल व दरवाजाचे कुलूप तोडून सहा जण चोरी करत असून मी त्यांना हटकले असता माझ्या हातावर कटावणी मारली, असे त्याने सांगितले.
त्यामुळे मी, लक्ष्मण मंडल, अरबाज खान, मोहित पंडित गोदामकडे गेलो व फोनवरून हॉटेलचे मालक संतोष डेंगळे यांना चोरीची माहिती दिली. यानंतर संतोष डेंगळे व शेखर डेंगळे हे हॉटेलवर आल्यानंतर बॅटरीच्या उजेडात अरगडे यांच्या शेतात चोरट्यांचा शोध घेत असताना आश्वी पोलिसाना चोरीची माहिती कळवली.
यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस नाईक शांताराम झोडगे, हवालदार प्रविण दैनिमाळ, होमगार्ड अर्जुन देवकर व माजी सैनिक सुनील गायकवाड यांनी चिंचपूर शिवारात अस्मिता डेअरी जवळ तिघांना पकडल्याचे कळवले. यावेळी या पकडलेल्या चोरट्यांनी आम्ही हॉटेल गोविंदमध्ये चोरी करण्यासाठी आल्याचे सांगून आमच्या सोबतचे 6 जण पळून गेल्याचे सांगितले.
दरम्यान यावेळी निमगावजाळीचे पोलीस पाटील दिलीप डेंगळे, ग्रामरक्षक दलाचे गौरव बिडवे, बाबासाहेब डेंगळे व पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार विनोद गंभिरे, अमर दांडगे या ठिकाणी आले. त्यांनी चौकशी केली असता त्या तिघांनी मुजाफ्फर बाबाशहा सय्यद, सचिन केशव जोशी (दोघे रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर) व अरबाज जहिर बेग (रा. सुभेदार गल्ली, वार्ड नं – 2, ता. श्रीरामपूर) अशी नावे सांगितली.
तर त्यांच्याकडील दोन दुचाकी व एक पिकअप वाहनासह त्यांना आश्वी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींनी सांगितले की, आमच्याबरोबरील सुलतान शेख, अरिफ शेख (दोघे रा. बेलापूर खुर्द, ता. श्रीरामपूर), आवेज उर्फ बाबा शेख (रा. रामगड, ता. श्रीरामपूर), शाहरुख शहा, अरिफ शेख (रा. वॉर्ड नं -2 श्रीरामपूर) व एक अनोळखी व्यक्ती पळून गेल्याचे सांगितले. यावेळी हॉटेलमधून 3 हजार 840 रुपये किमंतीची इंग्लिश दारू चोरीला गेली असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी नऊ जणाविरुध्द आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 104/2020 नुसार भारतीय दंड संहिता 395, 397 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 50 हजार रुपये किंमतीची पिकअप, 50 व 30 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी असा एकूण 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत. दरम्यान चौथा आरोपी अरिफ अल्ताफ शेख (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांच्या मुसक्या आवळत ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.