नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, याचा निषेध केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे म्हटले आहे. त्यातच, जम्मू काश्मीरमध्ये या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भावनिक होत भाषण केले.
सभागृहात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे. लोक जेव्हा आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. ही त्याची सुरुवात आहे. आपण असे काहीही बोलू नये किंवा दाखवू नये ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल. जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. आणि आता असे दिसते की लोक त्या टप्प्यावर पोहोचत आहेत.”
ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याबाबत जम्मू काश्मीर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी बंदुकीच्या माध्यमातून दहशतवादावर फक्त नियंत्रण मिळवता येईल. पण तो संपवला जाऊ शकत नाही. लोक जेव्हा आपल्यासोबत असतील, तेव्हाच तो संपुष्टात येईल. आज लोक आपल्यासोबत असल्याचे मला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री या नात्याने आपण पर्यटकांना निमंत्रण दिले होते. आलेल्या पाहुण्यांना, पर्यटकांना सुखरुप येथून पाठविण्याची जबाबदारी माझी होती. पण, नाही पाठवू शकलो. माफी मागायला माझ्याकडे शब्द नाहीत. काय बोलू त्यांना, त्या लहान मुलांना, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवा पत्नीला काय बोलू, जिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, असे भावनिक उद्गार ओमर अब्दुल्लांनी सभागृहात काढले. यावेळी, उपस्थित सदस्यांना बाकही त्यांनी वाजवू दिले नाहीत, आज नको.. असे म्हणत बाक वाजवणाऱ्यांना त्यांनी थाबवले. त्यांच्या या कृत्याने सभागृह स्तब्ध झाले होते.
या हल्ल्यात तेथील स्थानिक रहिवासी असलेला आदील नावाचा तरुण मृत्युमुखी पडला. यावरही अब्दुल्ला यांनी भाष्य केले. आदिलने आपल्या जीवाची बाजी लावून पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही इथे निवडून आलेल्या सरकारची नाही. सध्याच्या घटनेचा फायदा घेऊन मी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणार नाही. कारण ही योग्य वेळ नाही. आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असे आश्वासनही ओमर अब्दुल्ला यांनी दिले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा