Saturday, July 27, 2024
Homeनगरकांद्यावर निर्यातबंदी कायम; भाव पडल्याने संगमनेरात शेतकरी रस्त्यावर

कांद्यावर निर्यातबंदी कायम; भाव पडल्याने संगमनेरात शेतकरी रस्त्यावर

अहमदनगर, संगमनेर (प्रतिनिधी)

केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका नगर, नाशिक जिल्ह्यासह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. तर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. लासलगाव व अन्य ठिकाणी लिलाव बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काल संगमनेरबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. पण निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे मार्ग आडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे दीड तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

संगमनेर (प्रतिनिधी)

कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे मार्ग आडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे दीड तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. अखेर संगमनेर बाजार समितीच्या सभापतींनी फेर लिलाव करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

सभापतींनी सांगून सुद्धा व्यापारी फेर लिलाव करत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समिती सभापर्तीच्या दालनाच्या बाहेर येत फेरलिलाव न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. त्यानंतर सभापती व सचिव यांनी कांदा लिलावाच्या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांना लगेच फेरलिलाव चालू करण्याचे सक्त आदेश दिले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास व्यापाऱ्यांनी फेर लिलाव सुरू केले. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता मात्र शुक्रवारी अचानक हा भाव निम्म्याने घसरत दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल मिळू लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती मध्ये सुरू असणारे कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या समोर पुणे नाशिक मार्ग आडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनाची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे सहकाऱ्यांसह आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. कांद्याचे भाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांना येथे बोलवा आणि कांद्याचे भाव अचानक का कमी केले याचे त्यांनी उत्तर दिल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी कांदा व्यापाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. रात्री अचानक केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तुम्ही आम्हाला अगोदर कळवले का नाही? आम्ही कशाला कांदा आणला असता? असा संतप्त सवाल करत कांद्याचे पुन्हा फेर लिलाव करावे आणि कालच्या प्रमाणे भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. त्यानंतर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समजूत काढत कांद्याचे पुन्हा फेर लिलाव केले जातील असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन तीन वाजता मागे घेतले.

सभापतींनी दिलेल्या आश्वासनावर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा मार्केटमध्ये लिलावाच्या ठिकाणी आले अर्धा एकतास उलटून गेला तरी व्यापारी फेर लिलाव सुरू करत नव्हते, त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सभापतींच्या दालनाच्या बाहेर व्यापाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर सभापती शंकर खेमनर, थोरात साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ, सचिव सतीश गुंजाळ यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर कांदा लिलावाच्या ठिकाणी जात तात्काळ शेतकऱ्यांच्या कांद्याचे फेर लिलाव सुरू करा, असे सक्त आदेश दिले. त्यानंतर अखेर व्यापाऱ्यांनी पुन्हा कांद्याचे फेर लिलाव सुरू केले. ९०० रुपयांपासून तीन ते साडेतीन हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या कांदाला भाव काढण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

केंद्र सरकारने गुरुवारी रात्री निर्यात बंदी केली असल्याचे जाहीर केल्यानंतर बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे भाव अचानक कोसळले. त्यामुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या कांद्याला कमी भाव निघाले आहेत मात्र बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे फेर लिलाव केले जातील आणि जोपर्यंत केंद्र सरकार कांद्याचे भाव वाढवत नाही तोपर्यंत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये आणू नये, असे आवाहन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा लिलावाच्या ठिकाणी एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याच्या विरोधात अप शब्द वापरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला पकडत जाब विचारला त्यानंतर त्यांनी माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या