Sunday, April 27, 2025
Homeनगरकांद्याने आणले अनेकांना ‘अच्छे दिन’

कांद्याने आणले अनेकांना ‘अच्छे दिन’

भाव घसरल्याने लिंबू उत्पादक चिंतेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- कांदा सफरचंद आणि हापूस आंब्याच्या भावात विकला जात आहे. त्यामुळे रग्गड पैसा मिळत असल्याने अनेक कांदा उत्पादकांच्या जिवनात ‘अच्छे दिन’ आले आहेत. मात्र लिंबाचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.

- Advertisement -

सध्या सामान्यांच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले आहेत. एकिकडे वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना जेवणातून कांदा कपात करावी लागत आहे. तर हॉटेेलातून कांदा गायब झाला आहे. दुसरीकडे कांद्याला सफरचंदापेक्षा जास्त भाव आला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या भावात जोरदार वाढ होत आहे. नगर, श्रीरामपुरात कांद्याला क्विंटलमागे 10 हजारांचा भाव मिळाला. त्यानंतर घोडेगावात 13700 चा भाव मिळाला.

मंगळवारी झालेल्या लिलावात संगमनेरात 17100, राहुरी 15500, कोपरगावात 13700 रूपयांचा दर मिळाला. बुधवारी श्रीरामपुरात 14000 चा भाव मिळाला. लाल कांद्यालाही प्रथमच मोठा भाव मिळत आहे. ज्यांच्याकडे जुना कांदा बर्‍यापैकी होता. त्यांना याच कांद्याने लखोपती केले. अनेकांच्या पट्ट्या लाख, 2 लाख, 5 लाख, 7 लाख, 8 लाख अशा निघाल्या आहेत. नेवाशाच्या शिरसगावातील सोनाली लंघे यांना 125 गोणी कांद्याचे 8 लाख 33 हजार रूपये मिळाले. आयुष्यात कधी नव्हे एवढे पैसे कांद्याने दिल्याने काही शेतकर्‍यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर काहींच्या मुलींच्या लग्नाची काळजी मिटली म्हणत बँकांमध्ये एफडीत पैसे गुंतवले आहेत.

एकीकडे कांद्यामुळे शेतकरी मालामाल होत असतानाच, दुसरीकडे लिंबाचे भाव 30 रूपयांवरून 8 रूपयांपर्यंत घसरल्याने श्रीगोंदा, नगर, श्रीरामपूर व अन्य ठिकाणचे लिंब उत्पादक चिंतेत आहेत. एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी, काष्टी व अन्य गावात सुमारे दररोज 300 मेट्रिक टन लिंबाचे उत्पादन होत आहे. मात्र भाव घसरल्याने लिंबू उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या उत्तर भारतातील बाजारपेठेत लिंबू 20 रुपये किलो आहे. पण वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने व्यापार्‍यांनी लोणचे बनविणार्‍या कंपन्यांना लिंबू देण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांकडूनही मोतीमोल भाव दिला जात आहे. श्रीगोंद्याचे लिंबू नाशिक बाजारात जात होते. पण तेथेही भाव मिळत नसल्याने तेथे लिंबू पाठविणे बंद झाले आहे. नाशिकला 800 ते 1300 रूपये, नगर 500 ते 1500, श्रीरामपूर 800 ते 1500 चा भाव मिळत आहे.

कांद्यावर करडी नजर
नाशिकमधील कळवण आणि संगमनेरातील घारगावात कांदा चोरीच्या घटना घडल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे. त्यांना या कांद्यावर करडी नजर ठेवण्याची वेळ आली आहे. कळवण येथे पगार यांच्या शेतातून लाख रुपयांच्या कांद्याची चोरी झाली. तर दोन दिवसांपूर्वीच संगमनेरातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी संतोष दराडे यांच्या सतर्कतेने कांदा चोरीचा प्रयत्न फसला.

कांदा रोपांची चोरी

माळवाडगाव (वार्ताहर)- सध्या कांदा रोपाला मागणी वाढत असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव शिवारातून कांद्याचे रोप चोरी गेल्याची घटना घडली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सध्या कांदा रोपाची वाणवा झाली आहे. अशातच काल माळवाडगाव शिवारात खानापूर रस्त्यालगत अल्ताफ पठाण यांच्या मालकीच्या शेतात नजरेत भरेल असे अर्धा एकर क्षेत्रात कांदा रोप होते. अतिवृष्टीतून वाचलेल्या या रोपाची परिसरात खूपच चर्चा सुरू होती.

अशातच मध्यरात्री चोरट्यांनी शेताच्या मध्यभागी रोप उपटून पोत्यात भरून नेले. त्यात नेमके चोरट्यांचे एक रिकामे पोतेही याठिकाणी विसरुन गेले. चोरट्यांनी जाता जाता कांदा रोपातील तुषार सिंचनाचे तीन गण चोरुन नेले. ही वार्ता दुसर्‍या दिवशी शिवारात पसरताच खळबळ उडाली.

दरम्यान, हे कांदा रोप नव्याने कांदा लागवड करणार्‍याने नवे तर चालू लागवडीत रोप कमी पडलेल्या भुरट्या चोराने चोरल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत अल्ताफ पठाण यांनी हरेगाव पोलीस चौकी गाठली. याठिकाणी हजर असलेल्या पोलिस चौकीतील मदतनीस याने याठिकाणी आम्ही फक्त भांडणे, मारामारीची तक्रार घेतो, आपण श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला जावून फिर्याद द्यावी, असा सल्ला दिला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...