नाशिक। प्रतिनिधी Nashik
आज संविधान धोक्यात आले असून, भारताची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीचे स्तंभ आणि निवडणूक आयोग ही सर्वच केंद्राने एक प्रकारे आपल्या ताब्यात घेतले आहेत. परंतु सजग आणि जबाबदार जनता आता लोकशाहीला वाचविण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास खा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेत तिसरे पुष्प खा. अरविंद सावंत यांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर गुंफले. स्व. मोहनलाल चोपडा नाशिकरोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यान झाले.यावेळी माजी मंत्री बबन घोलप अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपनेते सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, डी. जी. सूर्यवंशी, संयोजक गौतम सुराणा, सुनील बुरड, सुभाष लुणावत, सोनल दगडे ( कासलीवाल) , श्रध्दा दुसाने (कोतवाल), श्रीकांत बेनी यांच्यासह क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बबन घोलप यांनी स्व.मोहनलाल चोपडा यांच्या आठवणींना उजाळा दिला. 28 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या व्याख्यानमालेच्या आयोजनाबद्दल आयोजक गौतम सुराणा आणि संयोजकांचे कौतुक केले. खा. सावंत पुढे म्हणाले की, मोदी नतमस्तक होऊन लोकसभेत आले तेव्हा देशाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे वाटत होते. परंतु खासगी उद्योजकांना पाठिंबा देताना, सार्वजनिक उपक्रमांना बळकटी देणे गरजेचे होते. परंतु कायदे करताना आकडा रेटून न्यायचा, काहीच बोलायचे नाही, अशी भूमिका सरकारकडून सुरू आहे. विरोधी पक्षांना सीबीआय, इडीसह तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. मणिपूर घटनेबाबत पंतप्रधान का बोलत नाही, याचे उत्तर विरोधी पक्ष मागतोय. परंतु ते मिळत नसल्याची खंत खा. सावंत यांनी व्यक्त केली.
पंचसूत्रींचे पालन होतेय का?
भगवान महावीर यांनी समाज अन् देशाला पंचसूत्री दिली. त्या पंचसूत्रींचा किती बांधव पालन करतात, हे प्रत्येकाने स्वतःलाच विचारले पाहिजे. त्याचप्रमाणे लोकशाही आणि संविधानानुसार देश खरोखर चालतोय का? याचे आत्मपरीक्षण देखील सरकारने करण्याची खरी गरज आहे. सरकार करीत नसेल तर आता जनता जनार्दनाने याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे खा. सावंत यांनी सांगितले.