संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
आतंकवाद हा मानवता धर्मासाठी सर्वात मोठा धोका असून संपूर्ण जगातील आतंकवाद हा संपलाच पाहिजे. पहेलगाम मध्ये निरापराध भारतीयांवर आतंकवाद्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय होता. या हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे यशस्वी केले असून भारतीय सैनिकांची ही कामगिरी सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
श्री.थोरात पुढे म्हणाले, भारतीय सैन्य दलाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची प्रतिक आहे. आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही आणि निष्पाप लोकांना मारणार नाही. ही परंपरा भारतीय लष्कराने आजही जपली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने कायम शांततेचा पुरस्कार केला आहे. मात्र पाकिस्तानी सातत्याने आतंकवादी कारवाया वाढवल्याने हे जगासाठी धोकादायक ठरत आहे. अतिरेकी किंवा आतंकवाद याला धर्म जात नसून तो मानवतेच्या विरोधात आहे आणि म्हणून तो संपवला पाहिजे. आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकविला होता. काश्मीर मधील पहलगाम येथे मागील महिन्यात निरापराध भारतीयांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
हा भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय होता. या हल्ल्या विरोधात भारतासह जगभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आणि त्याचा बदला आज भारतीय सैन्याने घेतला याचा तमाम भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्यदलाचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. माजी आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, एकाही निष्पाप व्यक्तीला लक्ष न करता फक्त संशयित अतिरेकी तळांवर हल्ले करणे ही आपली संस्कृती भारतीय सैनिकांनी जपली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद असून सैन्यदलाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
आ. सत्यजित तांबे म्हणाले, भारत हा शांतताप्रिय असा खंडप्राय देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यावर भारताने भर दिला आहे. मात्र पाकिस्तानने कायम भारताविरोधी दहशतवादी कुरापती केल्या आहेत. पाकिस्तान मधील सर्व दहशतवादांचे स्थळ उध्वस्त झाली पाहिजे ही तमाम भारतीयांची मागणी असून भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले असून पाकिस्तानला दिलेली ही मोठी चपराक आहे. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, भारताने कायम जगाला शांततेचा मंत्र दिला आहे. आम्ही शांतताप्रिय आहोत. मात्र जर सातत्याने आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्रास देणार्यांना शांत करू हा संदेश भारतीय सैन्याने दिला आहे.