नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला यावर संसदेत चर्चा होत आहे. सोमवारपासून (२८ जुलै) चालू झालेल्या या चर्चेत साधक-बाधक चर्चा होत आहे. हे ऑपरेशन राबवताना सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक, मोदी सरकारचे धोरण यावर विरोधक बोट ठेवत आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. दरम्यान, आज (२९ जुलै) खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींचे उदाहरण देतात, त्यांच्यात इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्के जरी हिंमत आहे तर संसदेत सांगा डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत असे थेट आव्हानच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
भारताने सरकारने मोठी चूक केली
“भारत सरकारने मोठी घोडचूक केली आहे. आपले कोणासोबत तरी भांडण झाले आणि आपण त्यांना सांगतो की आता ठीक आहे, आम्हाला लढाई नको आहे. आम्ही तुम्हाला एकदा कानाखाली मारली आहे, आम्ही तुम्हाला पुन्हा कानाखाली मारणार नाही. चूक सैन्याची नाही तर सरकारची होती. ट्रम्प यांनी २९ वेळा आम्ही युद्ध थांबवले आहे असे म्हटले. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर ते खोटे बोलत आहेत असे सभागृहात सांगावे. जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या ५० टक्केही हिंमत असेल तर ते येथे सांगावे. खरोखरच हिंमत असेल तर पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलत आहेत हे येथे सांगावे,” असे आव्हान राहुल गांधींनी दिले आहे.
सॅम माणेकशॉ यांनी सहा महिन्यांचा वेळ मागितला
आज या सभागृहात सॅम माणेकशॉ यांचे उदाहरण दिले गेले. त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनी सांगितले होते सहा महिन्यांचा वेळ द्या, आपल्याला जी मोहीम राबवायची आहे ती आपण उन्हाळ्यात राबवू. इंदिरा गांधींनी त्यांना पुरेसा वेळ दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवले ते फक्त त्यांची प्रतिमा सांभाळण्यासाठी असाही आरोप आज राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आपल्या देशातील सुरक्षा दलांचा उपयोग देशाच्या रक्षणासाठी झाला पाहिजे कुणाच्याही प्रतिमा जपण्यासाठी नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सांगायला हवे होते की जा तुम्हाला खुली सूट आहे. मात्र त्यांनी आपले पायलट असोत किंवा सैन्य दलं त्या सगळ्यांना हात बांधून युद्ध करायला पाठवले. पाकिस्तानशी युद्ध करण्याची तुमची राजकीय इच्छा शक्तीच नव्हती असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून वक्तव्य केले ते म्हणाले की भारत देश हा तुमच्या प्रतिमेपेक्षा मोठा आहे, तुमच्या राजकारणापेक्षा मोठा आहे, असेही राहुल गांधी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





