Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात 'प्रो-गोविंदा' स्पर्धेचे आयोजन

राज्यात ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धेचे आयोजन

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेली प्रो-गोविंदा स्पर्धा यंदा ३१ ऑगस्टला मुंबईत होईल. राज्यात प्रथमच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत प्रो-गोविंदा आयोजित करण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असून गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून मुंबईतील २० गोविंदा पथकांतील ३ हजार ५०० गोविंदांना विम्याचा लाभ होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अपघात होऊ नये यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार समिती नियमावली तयार करणार आहे. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास १० लाख रूपयांची मदत सरकारच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले. गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. वरळी भागातील इनडोअर स्टेडियमध्ये ४० फूट उंची असल्याने तिथे स्पर्धा आयोजित केल्याची माहितीही त्यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दर्जेदार खेळाडू तयार होतील : संजय बनसोडे

दहीहंडी या पारंपरिक स्पर्धा असून याचे रूपांतर उत्सवात झाले आहे. या स्पर्धेतून राज्याचा नावलौकिक वाढविणारे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला. या स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून याला साहसी खेळ म्हणून क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार असून पहिले बक्षिस ११ लाख रूपये, दुसरे बक्षिस ७ लाख रूपये, तिसरे बक्षिस ५ लाख रूपये आणि चौथे बक्षिस ३ लाख रूपये असे आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय समितीचे पूर्वेश सरनाईक, गीता झगडे, श्रीकृष्ण पडळकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या