दिल्ली । Delhi
मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा गौरव केला. यामध्ये एका मान्यवराला पद्मभूषण, तर पाच जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा बहुमान मिळाला.
या समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. यंदाचे पद्म पुरस्कार वितरण दोन टप्प्यांत पार पडले. पहिल्या टप्प्यात 71 व्यक्तींना, तर दुसऱ्या टप्प्यात 68 व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंगळवारचा सोहळा दुसऱ्या टप्प्याचा होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जोशी यांनी राजकारण आणि समाजसेवेत दिलेल्या योगदानाची या पुरस्काराने दखल घेण्यात आली.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील अप्रतिम योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. अतरौली घराण्याच्या ख्याल गायकीच्या परंपरेच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सुमधुर गायनाने भारतीय शास्त्रीय संगीताला नवे वैभव प्राप्त झाले आहे.
प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देण्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कलेने मराठी लिपीला जागतिक स्तरावर मान मिळवून दिला. होमिओपॅथीच्या माध्यमातून गरजूंना आरोग्यसेवा पुरवणारे डॉ. विलास डांगरे यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून हजारो रुग्णांना दिलासा दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना शेतीतील नावीन्यपूर्ण योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याने शेतकऱ्यांसाठी नवे आदर्श निर्माण केले आहेत.