नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे येथील जंगलात एक मोठी शोध मोहीम राबवत आहेत.
पहलगाम हल्ल्यातील ३ गुन्हेगारांचे रेखाचित्र तपास यंत्रणांनी जारी केले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचा एक फोटोही समोर आला आहे ज्यामध्ये ते शस्त्रांसह दिसत आहेत. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई मिळणार आहे.
याचबरोबर मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळही संपर्कात आहेत. त्यांना विषेश विमानांची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी आम्हाला कळवलं आहे की आम्हाला मदत हवी आहे त्या सर्वांना मदत देण्याचं काम आम्ही करत आहोत असंही फडणवीस म्हणाले आहेत.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे दुपारी २.३० आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर उपस्थित राहतील. योगेश कदम हे मृतांच्या पार्थिवांना त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्याची व्यवस्था करतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः सर्व यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरला पोहोचली आहे. जेणेकरून तेथील पार्थिव आणि नातेवाईकांना विमानात बसवण्याची व्यवस्था करतील.
मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे देखील मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश आहे. रविंद्र चव्हाण कालपासून त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. ते डोंबिवलीतील तिन्ही पर्यटकांचे पार्थिव घेऊन डोंबिवलीला रवाना होणार असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत आहेत.