मुंबई । प्रतिनिधी Mumbai
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या दोन दिवसात आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात सुरक्षित परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी उपलब्ध केली होती.त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी उ शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीस यांनी आज एकूण स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.
काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरिय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे १४ पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे.
आज, शुक्रवारी काश्मिरातून येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.
शिवनेरी बसची व्यवस्था
दरम्यान, काश्मीर येथे अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक श्रीनगर होऊन विशेष विमानाने आज रात्री मुंबईत पोहचले. या सर्व पर्यटकांना मुंबईतून त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या शिवनेरी बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. या बसमधून पर्यटक आपापल्या गावी रवाना झाले.